छत्रपती संभाजीनगर : हॉटेल ‘व्हिट्स’ च्या लिलाव प्रक्रियेतून आपला मुलगा सिद्धांत आणि त्याचे पाच भागीदार यांनी बाहेर पडावे, असा निर्णय आपण घेतला आहे. त्यांना व्यवहारातून बाहेर पडण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगू. ज्यांना या हॉटेलची किंमत ११० कोटी रुपये आहे असे वाटते त्यांनी पुढील लिलावात उतरावे. त्यांनी ते हॉटेल घेतले तर त्यांच्याकडे पेढे घेऊन जाईन, पण त्यांची तेवढी पत नाही, असे आरोप करत हॉटेल व्यवहारातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. मराठी माणसाला पुढे जाऊ न देणाऱ्या नेत्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी पत्रकार बैठकीत दिला.
‘हॉटेल व्हिट्स’ च्या लिलाव प्रक्रियेत ‘सिद्धांत मेटेरिअल प्रोक्युरमेंट ॲन्ड सप्लाअरर्स’ या कंपनीने ६४ कोटी ८३ लाख रुपयांची बोली लावली होती. या हॉटेलची किंमत बारा वर्षांपूर्वी ११० कोटी असताना त्यांची किंमत एवढी कमी कशी असा आक्षेप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाखल केला होता. ‘सिद्धांत साहित्य खरेदी व पुरवठा’ यांच्या विषयीच्या आक्षेपाचे वृत्त ‘दै. लोकसत्ता’ मध्ये प्रकाशित झाल्यानंतर राजकीय गोटात खळबळ उडाली.
त्यानंतर या व्यवहारात सर्वाधिक बोली लावणारे सिंद्धात हे आपले पुत्र असून त्यांच्यासमवेत या व्यवहारात पाच भागीदार असल्याची कबुली मंत्री संजय शिरसाट यांनी दिली होती. यानंतर या व्यवहारावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा नवे आरोप केले होते. ज्या नावाने लिलावात भाग घेतला होता त्यांची नोंदणीच तीन वर्षांपूर्वी झाली आहे. त्यामुळे त्यांची पत तपासली गेली नाही. लिलावाची जाहिरात राज्यस्तरीय दैनिकात प्रकाशित केली गेली नाही. अनेक प्रशासकीय अनागोंदी कारभार या प्रकरणात केले असल्याचा आरोप दानवे यांनी केला होता.
संजय राऊत यांनीही या प्रकरणावरून संजय शिरसाट यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती. या टीकेचा संदर्भ देत विरोधकांनी हे हॉटेल पुढील लिलावात चालवायला घ्यावे, असे आव्हान शिरसाट यांनी दिले आहे. या व्यवहारातून माघार घेऊ असे शिरसाट यांनी जाहीर केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांना विचारले असता ते म्हणाले, ‘अद्याप आमच्यापर्यंत कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. हा लिलाव घेण्यासाठी सर्वाधिक बोली लावण्याऱ्यांनी २० जूनपर्यंत २५ टक्के रक्कम भरण्याची मुदत आहे. ती रक्कम भरली नाही तर हा लिलाव आपोआप रद्द होईल. बोली लावण्यासाठी रक्कम भरताना २० लाख रुपयांची अनामत रक्कम जप्त केली जाईल.’