छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील प्रमुख सूत्रधार वाल्मीक कराड याची चल व अचल संपत्ती जप्त करा, अशी सरकारची भूमिका असल्याचा एक अर्ज मंगळवारच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात सादर केला असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चित करावे, असाही अर्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज सुमारे ५० मिनिटांचा युक्तिवाद झाल्यानंतर पुढील सुनावणी १७ जून रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले.

वाल्मीक कराड ३१ डिसेंबर रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला पुण्यात शरण आला. त्याच्या अटकेपूर्वीच कराड याचे बँक खाते व संपत्ती जप्त करण्यासाठीची हालचाल सुरू झाली होती. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडच्या संपत्तीविषयी अनेक आरोप केले होते. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात, लातूर, सोलापूरसह राज्याच्या विविध भागातही त्याची चल व अचल संपत्ती असून, कराडच्या मोबाईल फोनचे हाताळणेही विदेशातून होत असल्याची माहिती समोर आली होती. वाल्मीक कराडच्या वकिलांकडून अद्याप डिजिटल पुरावे मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. वाल्मीक कराडने यापूर्वी दोषमुक्तीचा अर्ज केलेला आहे. तर विष्णू चाटेने दोषमुक्तीचा अर्ज मागील सुनावणीवेळी मागे घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये भागिदारी असल्याचे आरोप झाले होते. कराड यास अटक करण्यासाठी त्याची बँक खाती राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्यांनी गोठवल्याची कारवाई केली होती.