नवी दिल्ली : भारतपेचे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांना कथित गैरव्यवहार प्रकरणी जारी केलेल्या ‘लुक आउट’ नोटिशीनंतर दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडवण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. हे दाम्पत्य गुरुवारी उशिरा सुट्टीसाठी न्यूयॉर्कला जाणार होते तेव्हा विमानतळावर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. 

हेही वाचा >>> पेटीएम, बजाज फायनान्स, एसबीआय कार्डला आरबीआयच्या कडक कारवाईचा सर्वाधिक फटका; शेअर्स ७ टक्क्यांपर्यंत घसरले

एक्स वरील एका टिप्पणीद्वारे ग्रोव्हर यांनी विमानतळावर त्यांना अडवण्यात आल्याची पुष्टी केली. भारतपेद्वारे ज्या बनावट मानवी संसाधन सल्लागार संस्थेला पैसे दिले गेले ती संस्था ग्रोव्हर आणि कुटुंबीयांद्वारे कथितपणे चालवली जात होती अशी तक्रार आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून याच तक्रारीची चौकशी केली जात आहे. निधी वळता करण्यासाठी जुन्या तारखा असलेल्या पावत्यांचा वापर केला गेल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तथापि, मे महिन्यांत प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला गेला. तेव्हापासून चार वेळा आंतरराष्ट्रीय प्रवास केला तेव्हा कधीही समस्या नव्हती आणि दरम्यानच्या कालावधीत एकदाही चौकशीसाठी बोलावले गेले नाही, मग आता कसे अडवले, याबद्दल ग्रोव्हर यांनी आश्चर्य व्यक्त केले. आर्थिक गुन्हे शाखेने मे महिन्यात ग्रोव्हर, त्यांची पत्नी माधुरी आणि कुटुंबातील सदस्य दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्या विरोधात भारतपेच्या तक्रारीनंतर ८१.३ कोटी रुपयांच्या फसवणुकीसाठी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला होता.