वॉशिंग्टन : भारतात सार्वत्रिक निवडणुकीचे वर्ष असूनही वित्तीय शिस्त कायम ठेवण्यात आली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली राहणार असून, जगातील आघाडीच्या देशांमध्ये भारताचे स्थान कायम राहील, असे कौतुक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) केले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे आशिया प्रशांत विभागाचे संचालक कृष्णा श्रीनिवासन म्हणाले की, सध्या भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करीत आहे. विकास दर ६.८ टक्के असणे ही अतिशय चांगली बाब आहे. याचबरोबर महागाईही कमी होत आहे. महागाई दीर्घकाळ निश्चित केलेल्या उद्दिष्टापर्यंत खाली येईल, याची काळजी घ्यावी लागेल. निवडणुकीचे वर्ष असून, वित्तीय शिस्त कायम राखण्यात आलेली आहे. अनेक देशांमध्ये निवडणुकीच्या वर्षात वित्तीय शिस्त पाळली जात नाही. सरकारने वित्तीय शिस्त पाळली असून, हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे दीर्घकालीन विकासाला गती मिळेल.

हेही वाचा >>> इन्फोसिसच्या भागधारकांना पाच वर्षात १.१ लाख कोटींचा धनलाभ!

गेल्या काही वर्षांत भारताने अनेक धक्के पचविले आहेत. त्यातून सावरत भारताने जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळविले आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ६.८ टक्के राहील, असा अंदाज आहे. सार्वजनिक गुंतवणूक आणि क्रयशक्ती यातील वाढीमुळे विकास दराला पाठबळ मिळेल. महागाईही कमी होत असून, ती सध्या ५ टक्क्यांवर आहे, असेही श्रीनिवासन यांनी नमूद केले.

वस्तूंच्या किमतीतील अस्थिरता हा सर्वांत मोठा धोका भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहे. भूराजकीय तणाव वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे. याच वेळी दीर्घकालीन विचार करता हवामानाशी निगडित आपत्तींचा धोका अधिक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– कृष्णा श्रीनिवासन, संचालक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी