डॉ. आशीष थत्ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिंतामण द्वारकानाथ देशमुख अर्थात यांना सगळे सी.डी. देशमुख याच नावाने ओळखायचे. १४ जानेवारी १८९६ मध्ये द्वारकानाथ आणि भागीरथीबाई यांच्या पोटी नातेगाव, रायगडाच्या जवळ त्यांचा जन्म झाला. छोट्याशा गावातून येऊन ही त्यांची प्रगती थक्क करणारी होती. जगन्नाथ शंकरशेट विद्यावेतन घेऊन १९१५ ला लंडन येथे शिकायला गेलेल्या चिंतामण यांनी संधीचे सोने केले. तिथल्या इतर शैक्षणिक पदवींबरोबरच चक्क आयएसच्या परीक्षेला बसून प्रथम क्रमांकदेखील मिळवला. १९२० मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी १९३९ पर्यंत त्यावेळच्या ब्रिटिश भारतीय सरकारमध्ये काम केले. त्यानंतर त्यांची नेमणूक तत्कालीन रिझर्व्ह बँकेमध्ये झाली आणि ऑगस्ट १९४३ मध्ये ते बँकेचे गव्हर्नर झाले.

ब्रिटिशांच्या काळात कुठल्याही भारतीयाला अशी संधी कधीच मिळाली नव्हती. ते स्वातंत्र्यानंतर म्हणजे ३० जून १९४९ पर्यंत गव्हर्नरपदी कायम होते. या काळात फाळणीनंतर बर्मा आणि पाकिस्तानच्या कार्यक्षेत्रातून बाहेर पडण्याचा किंवा ५००, १००० आणि १०,००० रुपयांच्या नोटांच्या निश्चलनीकरणाचा निर्णय त्यांच्या कारकीर्दीत महत्त्वाचा ठरला.

आणखी वाचा-बाजारातील माणसे : चार्ली मुंगेर आणि वॉरेन बफे

त्यानंतर ते नियोजन आयोगात सदस्य म्हणून रुजू झाले. त्यांच्या नियोजन आयोगातील कारकीर्दीत त्या वेळेचे अर्थमंत्री जॉन मथाई नियोजन आयोगाच्या वाढत्या प्रभावाबद्दल नाराज होते आणि त्यांनी राजीनामा दिल्यावर सी.डी. देशमुख भारताचे दुसरे अर्थमंत्री झाले. अर्थमंत्री झाल्यानंतर ते नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही काम बघत होते. त्यामुळे पुढील सर्व अर्थमंत्र्यांचा नियोजन आयोगात पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. त्याच वेळेला मुंबई प्रांताच्या कुलाबा मतदारसंघातून ते खासदार म्हणूनदेखील निवडून आले. पुढे जाऊन महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे करून मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करणाऱ्या अध्यादेशाचा विरोध म्हणून त्यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. १९५६ मध्ये भारताच्या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचे (यूजीसी) ते अध्यक्ष झाले आणि त्यांनी या संधीचा फायदा घेत देशपातळीवर वाचनालय उभे करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. १९६२ ते १९६७ मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम बघितले. १९६९ मध्ये स्वतंत्र पार्टी आणि जनसंघ यांचे संयुक्त उमेदवार म्हणून राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही.

आणखी वाचा-बाजारातील माणसं – ‘हमारा बजाज’ राहुल बजाज

१९४४ मध्ये इंग्लंडच्या राणीने त्यांना नाईटहूड म्हणजे ‘सर’ ही पदवी प्रदान केली होती. १९५९ मध्ये मॅगसेसे पुरस्कार आणि १९७५ मध्ये भारतातील द्वितीय सर्वोच नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना आणि त्यांच्या द्वितीय पत्नी दुर्गाबाई यांना गौरवण्यात आले. आर्थिक घडामोडींचे अचूक ज्ञान ठेवणारे अतिशय कमी अर्थतज्ज्ञ महाराष्ट्रातील आहेत त्यांपैकी एक होते ते सी.डी. देशमुख. आज त्यांची आठवण येण्याचे कारण म्हणजे भारतभर २ ऑक्टोबरला लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधीजींची जन्मतिथी साजरी करण्यात येते. पण याच दिवशी १९८२ मध्ये सी.डी. देशमुख यांनी जगाचा निरोप घेतला.

ashishpthatte@gmail.com

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintaman dwarkanath deshmukh print eco news mrj
First published on: 02-10-2023 at 10:16 IST