मुख्य परीक्षा स्वरूप: मुख्य परीक्षेत एकूण ९ पेपर असतात. ही परीक्षा परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची आहे, ज्यामध्ये उमेदवारांना लेखी उत्तरांद्वारे त्यांचे ज्ञान आणि विश्लेषणात्मक कौशल्ये प्रदर्शित करणे आवश्यक आहे. यात भाषेचे २ पेपर (६०० गुण) हे पात्रतेचे असून इतर ७ पेपर (१७५० गुण) हे गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जातात.

मुख्य परीक्षा पेपर – गुण

१. निबंध – २५०

२. जीएस १ – २५०

३. जीएस २ – २५०

४. जीएस ३ – २५०

५. जीएस ४ – २५०

६. भारतीय भाषा (पात्रता) – ३००

७. इंग्रजी भाषा (पात्रता) – ३००

८. वैकल्पिक विषय पेपर १ – २५०

९. वैकल्पिक विषय पेपर २ – २५०

मुख्य परीक्षा पात्रता: यात वर दिल्याप्रमाणे दोन पेपर असतात. ज्यात ‘भारतीय भाषा’ व ‘इंग्रजी’ या दोन पेपरचा समावेश आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी भारतीय भाषा म्हणून प्रामुख्याने ‘मराठी भाषा’ ही या पेपरसाठी निवडतात. दुसरा पेपर सर्वांसाठी अनिवार्य असून तो इंग्रजी भाषेचा असतो. यात ३०० पैकी ७५ गुण (२५) मिळविणे हा पात्रतेचा निकष आहे.

निबंध: यात १२५ गुणांसाठीचे २ निबंध १००० ते १२०० शब्दांत लिहिणे अपेक्षित असते. यात विद्यार्थ्यांचे आकलन व निर्णायक क्षमता तपासली जाते. आजकाल यूपीएससी तात्विक विषयांवर भर देत असून त्यासाठी लेखनाचा सराव असणे आवश्यक असते.

जीएस पेपर – समाविष्ट विषय

जीएस १ – आधुनिक भारताचा व जगाचा इतिहास , कला व संस्कृती, भूगोल, भारतीय समाज

जीएस २ – भारतीय संविधान, सामाजिक न्याय, प्रशासन व आंतरराष्ट्रीय संबंध

जीएस ३ – भारतीय अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान, अंतर्गत सुरक्षा, पर्यावरण, आपत्ती निवारण.

जीएस ४ – नीतिशास्त्र

जीएस पेपरमधील जीएस १ व ४ हे दोन पेपर बऱ्यापैकी स्टटिक आहेत. जीएस २ व ३ या दोन्ही पेपरवर चालू घडामोडींचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. यातील जीएस ४ म्हणजेच नीतिशास्त्र हा विषय २०१३ पासून यूपीएससी मुख्य परीक्षेचा भाग आहे. यात विद्यार्थ्यांची मानवी मूल्ये व नीतीमत्ता तपासली जाते. जेणेकरून भावी अधिकारी हे मूल्यव्यवस्था जपणारे असावेत.

वैकल्पिक विषय: यूपीएससी मुख्य परीक्षेत ५०० गुणांसाठी हा विषय असून यांचे प्रत्येकी २५० गुणांचे दोन पेपर असतात. यूपीएससीने २६ विषय हे वैकल्पिक विषय म्हणून दिलेले असून यात इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध, मानवविकासशास्त्र, मराठी साहित्य (साहित्यात हिन्दी, तमिळ, तेलगू इ. १३ साहित्याचे विषय यात समाविष्ट आहेत.). यापैकी विद्यार्थ्याने एक विषय हा वैकल्पिक विषय म्हणून निवडणे अपेक्षित आहे. वैकल्पिक विषयाला ‘किंगमेकर’ म्हटले जाते. कारण या विषयात आपण अधिकाधिक गुण घेवू शकतो हे जीएसच्या पेपरांमध्ये घेणे तेवढेसे सोपे नाही. त्यामुळे वैकल्पिक विषय निवडताना तो काळजीपूर्वक निवडणे अपेक्षित असते.

मुख्य परीक्षा तयारी करताना खालील बाबी लक्षात घ्या:

लेखन सराव: मुख्य परीक्षेत यश मिळवण्यासाठी संरचित उत्तर लेखनावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. उत्तरात अचूकता, शब्द मर्यादा, वेळेचे नियोजन इ. बाबींवर काम करणे आवश्यक आहे.

दंडात्मक गुण पद्धती : मुख्य परीक्षेत आयोगाद्वारे दिलेल्या सुचनांचे पालन न झाल्यास मिळालेल्या गुणांमधून काही गुण हे दंड मधून वजा केले जातात. यूपीएसीने अधिसूचनेमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, ‘उमेदवारांनी नोंद घ्यावी की, जर उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रकारचे असंबंधीत मजकूर/चिन्हे/खूणा आढळल्या, जे कोणत्याही प्रश्न/उत्तराशी संबंधित नसेल आणि/किंवा ज्यामुळे उमेदवाराची ओळख उघड होण्याची शक्यता असेल, तर आयोग एकूण गुणांमधून गुण कमी करेल किंवा अशा उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणार नाही.’

मुख्य परीक्षेची खालील गुणपत्रिका बघा ज्यात दंडात्मक गुण दिलेले आहेत –

● अभ्यासक्रमावर पकड हवी: मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकावर किमान २५० शब्द आपणास लिहिता येतील अशी तयारी आपली असायला हवी.

● चालू घडामोडींना प्राधान्य द्या: अभ्यासक्रमातील घटक आणि चालू घडामोडी यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. चालू घडामोडींचा अभ्यासक्रमाशी असलेला संबंध लक्षात घेवून अपेक्षित प्रश्नांवर काम करायला हवे.

● गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे पुनरावलोकन आणि विश्लेषण करा: मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्याने उमेदवारांना परीक्षेचे स्वरूप आणि कठीण पातळी समजण्यास मदत होते. तसेच आगामी काळातील प्रश्नाकडे जाण्याचा मार्ग सुकर होत जातो.

या लेखमालेत आगामी काळात आपण एकेक करून सर्व पेपर, त्यातील अभ्यासक्रम, प्रश्नपद्धती समजून घेणार आहोत जेणेकरून मुख्य परीक्षेसाठी तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करु शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sushilbari10 @gmail. com