मागील लेखातून आपण भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना, तिचा उद्देश आणि काँग्रेसच्या स्थापनेसंदर्भातील मांडण्यात आलेल्या विविध सिद्धांतांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारतीय राष्ट्रीय चळवळीविषयी जाणून घेऊ या. भारतीय राष्ट्रीय चळवळीचा अभ्यास आपण तीन टप्प्यात करणार आहोत. यापैकी पहिला टप्पा १९०५ ते १९१८, दुसरा टप्पा १९१८ ते १९२९ आणि तिसरा टप्पा १९३० ते १९४७ असा आहे. या लेखातून आपण भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या पहिल्या टप्प्याबाबत जाणून घेऊया. तसेच या काळात भारतातील लढाऊ राष्ट्रवाद वाढण्याच्या कारणांचा अभ्यास करूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – UPSC-MPSC : काँग्रेसच्या स्थापनेनंतर मांडण्यात आलेला ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ सिद्धांत नेमका काय होता?

अगदी सुरुवातीच्या काळातच भारतीय राष्ट्रीय चळवळीने भारतीयांच्या मनात देशभक्तीची भावना जोपासण्याची गरज असल्याची जाणीव करून दिली होती. सुरुवातीच्या काळात या चळवळीचे नेतृत्व हे मवाळ किंवा उदारमतवादी नेत्यांच्या हातात होते. या दरम्यान ब्रिटिशांनी भारतीयांच्या महत्त्वाच्या मागण्यांपैकी एकही मागणी मान्य केली नाही, त्यामुळे राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या भारतीयांचा भ्रमनिरास झाला. परिणामत: सभा, विनंती अर्ज, निवेदने यापेक्षाही अधिक प्रभावी अशा राजकीय कृतीची आवश्यकता असल्याची मागणी पुढे येऊ लागली. यातूनच लढाऊ राष्ट्रवादाचा उदय झाला.

लढाऊ राष्ट्रवादाचे साधारण दोन भागांत वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे जहाल किंवा उग्र राष्ट्रवाद, तर दुसरा म्हणजे क्रांतिकारी राष्ट्रवाद. दोन्ही राष्ट्रवादी विचार हे एकाच काळात उदयास आले. मात्र, यात एक मुख्य फरक होता; तो म्हणजे जहाल राष्ट्रवादी विचार हा आक्रमक असला तरी हिंसात्मक नव्हता, तर या उलट क्रांतिकारी राष्ट्रवादी विचार हा हिंसात्मक होता.

जहाल किंवा उग्र राष्ट्रवाद

लाला लाजपत राय (पंजाब), बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल आणि अरविंदो घोष हे जहाल राष्ट्रवादी विचारसरणीचे आघाडीचे नेते होते. भारतीयांनी स्वत: आपली मुक्ती साध्य केली पाहिजे आणि त्यांच्या अवनत स्थितीतून वर येण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले पाहिजे, अशी या नेत्यांची धारणा होती. या कार्यासाठी त्याग आणि त्रास सहन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे होते. परकीय राजवटीचा ते तिरस्कार करत. स्वराज्य किंवा स्वातंत्र्य हेच राष्ट्रीय चळवळीचे उदिष्ट असल्याचे त्यांनी जाहीर केले.

जहाल किंवा उग्र राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे

भारतीयांमधील वाढता आत्मसन्मान आणि आत्मविश्वास, शिक्षणाचा प्रसार आणि बेरोजगारी, बंगालची फाळणी, स्वदेशी आंदोलन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही घटना या लढाऊ राष्ट्रवादाच्या उदयाची महत्त्वाची कारणे होती. १८ व्या शतकाच्या अखेरीस भारतीयांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाची भावना वाढत होती. देश चालवण्यासाठी आपण सक्षम आहोत, याची जाणीव त्यांना झाली. लाल-बाल-पाल या नेत्यांनी आत्मसन्मानाचा संदेश सर्वत्र पोहोचवला. भारतीयांनी निर्भीड बनावे, असा संदेश त्यांनी दिला.

१९ व्या शतकाच्या अखेरीस भारतात शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. सुशिक्षित भारतीयांची संख्याही बरीच वाढली होती. अनेक सुशिक्षित तरुण ब्रिटिश सरकारच्या प्रशासनात काम करत होते. त्यामुळे ब्रिटिशांच्या धोरणांचे परिणाम त्यांना समजू लागले. यातूनच काही तरुण जहाल राष्ट्रवादाकडे वळले.

हेही वाचा- UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना

याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही घटनाही जहाल राष्ट्रवादाच्या उदयासाठी प्रेरक ठरल्या. इ.स. १८९६ मध्ये इथोपियांनी इटलीचा पराभव केला. तसेच १९०५ मध्ये जपानने रशियाचा पराभव केला. एका आशियायी देशाने एका युरोपिय देशाचा पराभव केला, हे ऐकून भारतीयांमध्येही उत्साह संचारला. याशिवाय आयर्लंड, रशिया आणि चीनमधील क्रांतिकारी चळवळींचाही भारतीयांच्या मनावर चांगलाच परिणाम झाला. एकत्र येऊन जुलमी सरकारविरोधी लढता येते, याची जाणीव भारतीयांना झाली. हे जहाल राष्ट्रवादाच्या उदयाचे एक महत्त्वाचे कारण होते.

याशिवाय बंगालचे विभाजन आणि स्वदेशी चळवळही जहाल राष्ट्रवादाच्या उदयाचे एक महत्त्वाचे कारण होते. याबाबत पुढील लेखात आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc modern indian history what were the reasons for rise of revolutionary nationalism in british india spb
First published on: 23-08-2023 at 19:07 IST