श्यामल कुरुंदकर पत्की

‘‘बाबा स्वत: नास्तिक होते. देव आणि धर्म यावर त्यांचा विश्वास नव्हता. पण, ‘देवावर विश्वास ठेवणारे लाखो लोक माझ्या अवतीभोवती आहेत. त्यांच्यापासून तुटून पडण्यावरही माझा विश्वास नाही. त्यांना बरोबर खेचून आणण्यासाठी आवश्यक ती व्यवहारातील तडजोड करण्यास मी तयार आहे. विचारात मात्र तडजोड नाही. कारण विचार तुम्हाला कुठे जायचं आहे याची दिशा दाखवितात आणि व्यवहार तुम्हाला टप्प्याटप्प्याने तिथपर्यंत खेचून नेत असतो.’ असं ते म्हणत. बाबांनी आपल्या आयुष्यात माणसं कधी तोडली नाहीत, तुटू दिली नाहीत. किंबहुना ‘माणूस’ हाच त्यांच्या जीवनाचा केंद्रिबदू होता.’’ सांगताहेत श्यामल कुरुंदकर पत्की पिता नरहर कुरुंदकर यांच्याविषयी..

इतरांच्या वडिलांसारखे आमचे बाबा नव्हतेच. पण म्हणून आम्हाला त्याची खंत वाटत होती असं काही नाही. कदाचित लहानपणापासून आमच्या आईने (प्रभा) आमच्यामध्ये ही भावना रुजवली होती. आम्ही चौघं भावंडं. तिघी बहिणी व एक भाऊ. मी सगळ्यात मोठी. मग रेवती, विश्वास आणि तेजस्विनी. बाबा अभ्यासात, वाचनात असतात, त्यांच्याभोवती विद्यार्थी असतात किंवा इतर कुणीतरी असतंच. सतत चर्चा चाललेली असते, लिखाण चाललेलं असतं याचा स्वीकार आमच्या आईने आमच्यात निर्माण केला होता, रुजवला होता.

कुठेही कसलीही कमतरता किंवा तक्रारीला जागाच दिसत नसे. ते आमच्या सोबतच आहेत, आभाळासारखे आणि कसलाही प्रश्न आपल्याला पडणारच नाही, ही जाणीव आमच्या मनात सतत होती. सगळं घर बाबाकेंद्रित होतं. बाबांना ते घरी असले की आम्ही सगळे घरी समोर असायला पाहिजेत असं वाटायचं, अगदी आईसह! व्याख्यानासाठी बाहेरगावी असले तरी नियमितपणे घरी पत्र पाठवत. सांगितलेल्या वेळी घरी येत असत. तिला ते म्हणत की, ‘तुझ्याशिवाय मला करमत नाही.’  माझ्या आईचा आवाज फार छान होता. बाबा कधी तरी तिला गाणे गायलाही सांगत. आम्ही बाबा घरी यायच्या वेळेला खेळ आटपून घरी येत असू.  कधी वेळ झाला किंवा काही चूक झाली की ते आम्हाला ‘कान धरून उभे रहा’ अशी शिक्षा देत. मग त्यांच्याकडे येणारी जाणारी माणसं असली तरी आम्ही आपले कान धरून उभे, ते ‘जा आता’ म्हणेपर्यंत!  या शिक्षेची प्रचंड भीती आमच्या मनात होती. ते कधी रागवले नाहीत, ओरडले नाहीत, त्यांनी कधी आमच्यावर हात उगारला नाही पण चुकलो तर ही शिक्षा असे.

त्या वेळी आम्ही होळीवर कोंडोपंत पाटलांच्या घरात राहत होतो. मातीचं सारवणाचं घर, एक बैठक, एक स्वयंपाकघर, एक झोपण्याची म्हणा अशी खोली. बाबांच्या बठकीच्या बाजूला एक छोटी स्टोअर रूमसारखी खोली होती. जिथे जळण भरून ठेवलेलं असे. आमच्याकडे जवळपास १९७० पर्यंत चुलीवर स्वयंपाक होत असे. बठकीत तक्क्य़ाला टेकून बाबा बसलेले असत. पालथी मांडी घालून वाचण्यात दंग असत. त्यांच्या उजव्या हाताला एक लाकडी अलमारी पुस्तकांनी भरलेली आणि खाली जमिनीवर हाताशीसुद्धा पुस्तकंच पुस्तकं. त्या आलमारीवर एक डबा असे त्यात चॉकलेट, खारीक, खोबरं, बदाम, काजू आणि किसमीस असत. बाबा रोज या खाऊचे हिस्से करुन ठेवत. प्रत्येकाने आपला हिस्सा सकाळी घ्यायचा.

या वेळी आमच्याकडे विजेचे दिवे नव्हते. कंदिलावर, एक्क्यावर अभ्यास करावा लागे.

मी ‘प्रतिभा निकेतन’ शाळेत शिकत होते आणि बाबा ‘पीपल्स कॉलेज’मध्ये प्राध्यापक. घर सगळं आईची जिम्मेदारी! बाबा १९५५ मध्ये नांदेडला आले. ‘प्रतिभा निकेतन’मध्ये त्यांना शिक्षकाची नोकरी लागली होती. नुकतेच लग्न झालेले. आई त्या वेळी वसमतला माझ्या आजी-आजोबांसोबत राहत असे. वसमत हे आमचे मूळ गाव. कारण त्यांचे व्यावहारिक जीवन नेहमीच समाधानी राहिले. आमच्या घरात मी कधीच आई-बाबांना असमाधानी किंवा नाराज पाहिले नाही. पसा भरपूर होता असेही नाही. पण पशांची चणचण त्यांच्या बोलण्यातही कधी जाणवली नाही. परिस्थितीबद्दल कधी तक्रारही नव्हती. जास्तीचे मिळावे अशी हावही नव्हती. पगाराचे पैसे आईचे असत, तिला घर चालविण्यासाठी. आणि व्याख्यानाचे मानधन, लेखाचे मानधन आदी येणारे पैसे बाबांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अडीअचणी सोडविण्यासाठी असत.

बाबांना ‘प्रतिभा निकेतन’ संस्थेमध्ये नोकरी लागली आणि मग त्यांच्या वसमत-नांदेड चकरा सुरू झाल्या. पण एके दिवशी आई व आजीने संगनमत केले. जरुरीपुरते सामान घेऊन आई नांदेडला आली आणि बाबांना कळविले की इथे-इथे घर आहे, मी नांदेडला आले आहे आणि अशा रीतीने त्यांचा संसार तिथे सुरू झाला. तसा माझ्या आई-बाबांचा प्रेमविवाह होता. बाबा हैदराबादला  मामा नारायणराव नांदापूरकर यांच्याकडे शिक्षणासाठी राहत असत. बाबांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या मामांचा म्हणजे नारायणराव नांदापूरकरांचा मोठाच प्रभाव होता. हे बाबांचे मोठे मामा कै. नारायणराव नांदापूरकर मराठवाडय़ातील साऱ्या मराठी चळवळींचे उगमस्थान. बाबांनी जेव्हा आईला लग्नाबद्दल विचारले तेव्हा ते ‘इंटर नापास’ होते. त्यांना वाटले होते की एका नोकरी नसलेल्या, पदवी नसलेल्या मुलाला नकारच मिळणार आहे. पण आईने होकार दिला आणि सगळेच चित्र पालटले. या एका ‘होकाराने’ एका क्षणात परीक्षेत पास होणे, नोकरी करणे, संसार चालवणे या सगळ्या जबाबदाऱ्या सोबत आणल्या. आपला संसार चार-चौघांसारखा असणार नाही, हे आईने त्याचवेळी ओळखले होते, स्वीकारले होते.

बाबांचे सगळे लक्ष शिकण्यात व शिकविण्यात आणि संसाराची सारी सूत्रे आईच्या स्वाधीन! बाबांना संसाराच्या या भागाची काळजी करण्याची गरज नसल्याने त्यांनी त्यांचा पूर्णवेळ निर्धास्तपणे लेखन, वाचन, शिक्षण, नोकरी, समाजकारण यांना दिला. संसारातली कोणतीही अडचण त्यांच्या समोर येऊ नये, असा आईचा प्रयत्न असे. आमच्या घरासमोर एक कडुलिंबाचे मोठे झाड होते. कधी-कधी बाबा दुपारी झोपत. अशा वेळी या झाडावर कावळ्यांनी गोंधळ करून बाबांची झोप मोडू नये म्हणून ती दरवाजात बसून राही. संसाराची एक बाजू माझ्या आईने ताकदीने सांभाळली. आमचे बाबा कधी आजारी पडल्याचे मला आठवत नाही. फक्त एकदा १९७० मध्ये मात्र त्यांना झालेल्या गॅस्ट्रोमुळे त्यांची अवस्था गंभीर झाली होती. त्यासाठी दवाखान्यात दाखल करणे आवश्यक होते. पण हे दवाखान्यात जायला तयारच नव्हते. घरात चक्कर येऊन पडले, हाताला खूप मार लागला, कसेबसे उठवून पलंगावर झोपविले. मी पळत जाऊन डॉ. सहस्रबुद्धे यांना घेऊन आले.

त्यांनी घरीच सलाइन देण्याची व्यवस्था केली. या आजारानंतर त्यांना कावीळही झाली. खूपच थकवा आणि अशक्तपणा यामुळे स्वभावात चिडचिडेपणाही आला होता. पण थोडेफार बरे वाटले, थोडे हिंडू-फिरू लागले की शिकविण्याची गडबड सुरू. या वेळी आम्ही होळीवरच परंतु डोईफोडे यांच्या घरात भाडय़ाने राहत होतो. तिथेही एक खोली वर होती आणि दहा-बारा पायऱ्या चढून जावे लागे. बाबा विद्यार्थ्यांना घरी बोलवत. घरीच त्यांना शिकवत. या पायऱ्या त्यांना उभ्याने चढता येत नसत इतका अशक्तपणा होता. तरी ते बसून पायऱ्या चढत आणि उतरत. बाबांच्या विद्यार्थ्यांनी या काळात बाबांची काळजी घेतली.

१९६६-६७ पर्यंत बाबा महाराष्ट्रात चांगलेच प्रसिद्ध झाले होते. सर्वत्र त्यांचे नाव गाजत होते. १९६० मध्ये पुणे येथील वसंत व्याख्यानमालेतील त्यांचे व्याख्यान खूपच गाजले. ‘रिचर्ड्सची कलामीमांसा’, ‘रूपवेध’, ‘मागोवा’, ‘जागर’, ‘धार आणि काठ’ ही पुस्तके प्रकाशित झाली होती. ‘रूपवेध’, ‘धार आणि काठ’ व ‘शिवरात्र’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली होती. मराठवाडय़ाचे नाव सर्वत्र दुमदुमत होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, वैचारिक, शैक्षणिक, बौद्धिक जीवनात ते सर्वार्थाने सक्रियपणे उतरले होते. बाबा व्याख्यानाला जात तेव्हा फक्त अलिप्तपणाने व्याख्यान देणे अशी त्यांची भूमिका नसायची. तिथल्या श्रोत्यांशी ते एक आंतरिक संवाद, जवळीक निर्माण करीत. व्याख्यानाने श्रोत्यांना जेवढे भारावून टाकले जाई, त्यापेक्षा व्याख्यानानंतर श्रोत्यांचे प्रेम व विश्वास संपादन करीत असत. समोरच्या व्यक्तींशी त्यांचे आत्मीयतेचे नाते जडत असे. या नात्याला विश्वासाचा खंबीर पाया असल्याने लोक त्यांच्याशी मनमोकळे बोलत. आपली सुख-दु:खं, प्रेमप्रकरणं, चुका, संकटं, सारी गुपितं त्यांच्या जवळ सांगत असत. यात त्यांचे विद्यार्थी, विरोधक, मित्र सारे जण असत. कारण बाबांचं व्यक्तिमत्त्वच असं होतं. की त्यांचं वैचारिक विरोधकसुद्धा व्यक्तिगत जीवनात त्यांच्यावर प्रेम करीत असत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बाबांच्या मते, ‘‘जीवनाला एकच एक कक्षा किंवा गती नसते. अनंत पातळ्या, अनंत दिशा, अनंत गरजा यांनी जीवन बनलेलं असतं. म्हणून जी माणसं परस्परविरोधी दिसतात, तीही वंदनीय गुणांची प्रतिनिधी असतात. एवढंच नव्हे तर एकेरी विचारांची माणसं जीवनाच्या सर्वागीण विकासाला अडथळाच आणतात.’’ वैचारिक मतभेद आणि माणूसपण हे त्यांनी पेललेलं शिवधनुष्य होतं.

ते स्वत: नास्तिक होते. देव आणि धर्म यावर त्यांचा विश्वास नव्हता. पण, ‘‘देवावर विश्वास ठेवणारे लाखो लोक माझ्या अवतीभोवती आहेत. त्यांच्यापासून तुटून पडण्यावरही माझा विश्वास नाही. त्यांना बरोबर खेचून आणण्यासाठी आवश्यक ती व्यवहारातील तडजोड करण्यास मी तयार आहे. विचारात मात्र तडजोड नाही. कारण विचार तुम्हाला कुठे जायचं आहे याची दिशा दाखवितात आणि व्यवहार तुम्हाला टप्प्याटप्प्याने तिथपर्यंत खेचून नेत असतो.’’ असं ते म्हणत. बाबांनी आपल्या आयुष्यात माणसं कधी तोडली नाहीत, तुटू दिली नाहीत. किंबहुना ‘माणूस’ हाच त्यांच्या जीवनाचा केंद्रिबदू होता. मला समजतं तेव्हापासून मी सतत त्यांच्या सोबत राहायची. सर्व भावंडांत मोठी असल्याचा फायदा मला झाला. त्यांच्याबरोबर गावात कुठेही व्याख्यान असलं, की मी त्यांच्या मागे-मागे असेच.

किती साहित्यिक, किती विद्यार्थी, राजकारणी, समाजकारणी, कवी, लेखक सारखे या ना त्या निमित्ताने आमच्याकडे येत असत. बाबा सतत कोणत्या ना कोणत्या विषयावर त्यांच्याशी बोलत असत. ‘विद्यार्थी’ हा तर त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. कधी-कधी मला त्यांच्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटायचा. वाटायचं, आपण विद्यार्थी असतो तर जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत राहता आलं असतं. महाविद्यालयात असताना बाबांच्या वर्गात बसण्याची माझी फार इच्छा असे. पण माझा विषय इंग्रजी असल्याने त्यांनी मला कधी त्यांच्या वर्गात बसू दिलं नाही. ही गोष्ट वेगळी की, घरी कित्येक वेळा त्यांनी मला इंग्रजी भाषेतील कादंबऱ्या, कविता समजावून दिल्या. बाबांनी आम्हाला तसं मुद्दाम काही शिकवलं, सांगितलं नाही. पण त्यांचं वागणं, बोलणं आतबाहेर एक असणं यातून आमच्यावर संस्कार घडत गेले. त्यांनी आम्हाला विचार कसा करावा हे शिकवलं. आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्यांचा आदर करायला शिकवलं. जो विचार आपल्याला पटला तो इतरांना समजावून देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत राहावं, असं त्यांना वाटे. पण त्यामुळे इतर विचार नामशेष करता येतीलच असं नाही. कारण माणूस भिन्न-भिन्न प्रकारचा आहे. त्याची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पण आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण पटवून देण्याचा प्रयत्न करीत राहावं, असं त्यांचं मत होतं. ‘‘अशा वैचारिक मंथनातूनच स्वातंत्र्य पचविण्याएवढं सुसंस्कृत मन तयार होत असतं आणि ते तयार करावं लागतं,’’ असं ते म्हणत. सतत नवीन वाचणं, वेगळ्या प्रकारे विचार करणं आणि तो लोकांना पटवून देणं हाच ध्यास त्यांना होता. या अंत:प्रेरणेने ते सतत प्रबोधन करीत राहिले. लोकशिक्षकाची भूमिका समर्थपणे निभवत राहिले. हा ऊर्जास्रोतच त्यांच्या जगण्याचं प्रयोजन होता. अध्ययन आणि अध्यापन या त्यांच्या जीवनाच्या दोन बाजू होत्या.

‘माणूस’ हा त्यांच्यासाठी अतीव प्रेमाचा विषय! त्यांचा माणसाच्या सद्गुणांवर आणि माणुसकीवर प्रचंड विश्वास होता. ते प्रकांडपंडित होते. बुद्धिवादी होते. पण ‘‘बुद्धिवादाच्या काही मर्यादा आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुद्धी व तर्क यांचा वापर कोणत्या कक्षेत करायचा हे बुद्धिवाद्याला कळलं पाहिजे. त्याची सीमा जर आपण विसरलो तर मानवी जीवनातील सगळं काव्य व माधुर्य आपण गमावून बसू आणि  जीवनाला यंत्र बनवून टाकू,’’ असं ते म्हणत.

बाबांची प्रखर बुद्धिमत्ता आमच्यासाठी नेहमीच उबदारपणा घेऊन आली. एकदा माझी बहीण रेवा हिच्या डोळ्यांना काही संसर्ग झाला होता. तिने डोळे जे बंद करून घेतले ते उघडायलाच तयार नव्हती. बाबा त्या वेळी बाहेरगावी गेलेले होते. दुसऱ्या दिवशी येणार होते. त्यांनी घरात पाय ठेवताच परिस्थितीचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी रेवाला गोष्टी सांगत सांगत भुलवलं आणि हळूहळू आपल्या हातांनी तिचे डोळे उघडले. राणी (तेजस्विनी), विशू यांना सहलीच्या वेळेस शाळेच्या बसपर्यंत नेऊन सोडणं, सहलीवरून आल्यावर उतरवून घ्यायला जाणं, त्यांचे हट्ट पुरविणं, लहान-सहान गोष्टीसुद्धा ऐकून घेणं या सगळ्या बाबी ते मनपूर्वक करत. त्यांच्या मनातलं लहान मूल त्यांनी जिवंत ठेवलं होतं. त्यामुळे आयुष्य भरभरून जगणं त्यांना जमत असे. कधी कंटाळा नाही, निराशा नाही, सदैव उत्साह. त्यांचं व्यक्तिमत्त्व असं सकारात्मक होतं की, आपल्याला वाटे हे बरोबर असतील तर कोणतंही संकट आपल्यावर येणारच नाही आणि आलं तरी आपण ते चुटकीसरशी पार करू.

बाबा व्याख्यानाला उभे राहिले की श्रोत्यांवर त्यांचं गारुड होत असे. व्याख्याता व श्रोता एकमत होऊन जात. श्रोत्यांच्या नकळत बाबा त्यांना स्वत:बरोबर घेऊन जात. अत्यंत सरळ सोप्या भाषेत अवघड विषय समजून देत असत. त्यांची व्याख्यानं म्हणजे वैचारिक मेजवानी असे. तो काळच नांदेडच्या साहित्य, नाटय़, संगीत, इतिहास क्षेत्रातील नवनवीन प्रवाहांच्या सुवर्णयुगाचा होता. आपल्या नांदेडने सर्व क्षेत्रात मराठवाडय़ाचं नेतृत्व करावं असं त्यांना वाटे. मराठवाडय़ाच्या जवळपास सर्व शैक्षणिक, सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. नांदेडचं गायन-वादन विद्यालय, संस्कृत पाठशाळा, महाजन साहित्य प्रकाशन मंडळ, गोदातीर इतिहास संशोधन मंडळ, अभिनव चित्रशाळा, नेरली कुष्ठधाम वगैरे सर्व संस्था वाढाव्यात, समृद्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न केले. व्यवहारात अत्यंत काटेकोर, कठोर असणारे बाबा आपल्या संस्थेच्या उभारणीसाठी आपल्याकडे हवेतच, असं लोकांना वाटे.

वर्षांतला एक दिवस खास आम्हा मुलांसाठी बाबांनी राखीव ठेवलेला असे. मग त्या दिवशी आम्ही आईसक्रीम खायला जात असू. आम्ही चौघं, आई आणि बाबा. ज्याला जितकं पाहिजे तितकं आईसक्रीम खाण्याची मोकळीक असे. मग पान आणि जमलं तर चित्रपट, असा त्या दिवशीचा कार्यक्रम असे. पुढे माझं व रेवाचं लग्न झाल्यावरसुद्धा दोन्ही जावयांसह हा उपक्रम साजरा केला जाई. माझा विवाह १९७९ मध्ये दीपनाथ पत्की यांच्याशी झाला. आमचा प्रेमविवाह. चाळीस वर्षांपूर्वी सगोत्री विवाह ही एक ‘घटना’च होती. विरोध झाला पण स्वत: बाबाच माझ्यासोबत होते. त्यामुळे विरोधाला धार चढलीच नाही. दीपला बाबा चांगले ओळखत होते. तो आमच्याच ‘पीपल्स कॉलेज’मध्ये कॉमर्सचा विद्यार्थी आणि विद्यार्थी चळवळीतील धडाडीचा कार्यकर्ता होता. आमचं घर तसं ‘चौकोनी’ पण पत्कींचं मात्र एकत्र कुटुंब होतं. मोठं कुटुंब, रोज पंचवीस माणसं पंगतीला असत. या लग्नाला होकार देताना बाबा मला म्हणाले, ‘‘बेटा लग्नाने केवळ नवराच आपला होत नसतो. त्याचं सगळं कुटुंबच आपलं होत असतं, तेही त्यांच्या गुणदोषांसकट.’’ मुलगा निवडण्याचं मुलीचं स्वातंत्र्य त्यांनी मानलं. ‘विवाह अशा-अशा पद्धतीनं झाला पाहिजे.’ या आजीच्या व आईच्या मताचा त्यांनी आदर केला. वैचारिक निष्ठा आणि वैयक्तिक ऋणानुबंध यात संघर्ष निर्माण करणारे प्रसंग त्यांच्या आयुष्यात अनेकदा आले. त्या-त्या वेळी सर्व दोषारोप सहन करून वैयक्तिक ऋणानुबंध त्यांनी जपला. त्याला महत्त्व दिलं. लोकिनदेने भाजून निघताना कोणाच्या तरी ऋणानुबंधाची किंमत मोजतो आहोत हे त्यांचं समाधान असे. यासाठी लागणारं प्रचंड मानसिक धर्यही त्यांच्या जवळ होतं.

आमच्या घरी देवघर नव्हतं. घरी येणाऱ्या सर्वाना मुक्तद्वार होतं. स्वयंपाकघर हे सर्वाच्या आनंदाचं ठिकाण. एकत्र बसून आम्ही जेवत असू. बाबांच्या सोबत बऱ्याच वेळेला कोणी विद्यार्थी, सहकारी, मित्र जेवायला असे. कोणत्याही व्यक्तीच्या धर्माची, जातीची कधी चर्चा किंवा उल्लेख आमच्याकडे होत नसे.

बाबांचं त्यांच्या विद्यार्थ्यांवर अतिशय प्रेम होते. कोणत्याही थराला जाऊन ते त्यांना मदत करीत. खरं म्हणजे जितकं मी बाबांना त्यांच्या सोबत राहून समजू शकले त्यापेक्षा किती तरी अधिक आणि किती तरी जवळून मी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या नजरेतून त्यांना पाहिलं. त्यांचा ‘माणूस’ म्हणून मोठेपणा मला ते गेल्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्याबद्दल असलेल्या भावनेतून कृतज्ञतेतून कळत गेला. गोदातटीचे कैलासलेणे, ज्ञानसूर्य, ज्ञानेश्वर, चालते बोलते विद्यापीठ, माणुसकीचा मंत्रद्रष्टा, वगैरे उपाध्या,पदव्या,अभिधानं त्यांना लावली गेली. त्यांची विद्वत्ता प्रखर, सर्वस्पर्शी तर होतीच. साहित्य, इतिहास, नाटय़शास्त्र, गायन, चित्रकला, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र कोणताही विषय त्यांना वर्ज्य नव्हताच. त्यांची प्रज्ञा सर्वत्र सारख्याच सहजतेने तळपत असे. आमच्यासाठी तर ते सर्व काही होते. ते होते तोपर्यंत त्यांची आभाळमाया आमच्यावर मोरपिसासारखी होतीच. पण ते गेल्यावर त्यांची ही आभाळमाया त्यांच्या किती विद्यार्थ्यांवर होती. किती जणांचं आयुष्य त्यांच्या जाण्याने बदललं याची जाणीव होत गेली.

आमचे इंग्रजी शिकविणारे हरिहर कुलकर्णी सर, पुढे हे ‘प्रतिभा निकेतन’चे प्राचार्य झाले. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम केलेले शास्त्रज्ञ निवृत्ती कदम, परभणीचे संतुक देशमुख.. किती विद्यार्थ्यांची नावं घ्यावीत? सगळे गरीब घरातले. वार लावून शिकणारे. त्यांच्या जेवण्याची शिक्षणाची, फी-पुस्तकांची सोय बाबांनी केली. तसनीम पटेल ही मुस्लीम मुलगी गरीब, हुशार, पण शिकावं कसं? बाबांनी तिच्या राहण्याची, कपडे, अंथरूण-पांघरूण, औषधी, महाविद्यालयाची फी, पुस्तकं अशी सर्वतोपरी मदत केली. पुढं तिनं शिक्षणक्षेत्रात मोठमोठी पदं भूषवली.

संतुक देशमुख यांना शिकायचं होतं. जवळ फक्त एक रुपया होता. सायन्स कॉलेजला प्रवेश हवा होता. त्यांच्या सर्व शिक्षणाची सोय बाबांनी या एक रुपयात केली हे त्यांनीच मला सांगितलं. ‘नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्रा’च्या संदर्भात आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांना बोलवत नव्हतं. गळा भरून आला होता. असे बाबांचे विद्यार्थी..

गुरुजींचं नाव घेताच आजही त्यांच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहायला लागतं आणि मग कहाणी सुरू होते ती त्यांच्यावरच्या बाबांच्या अलौकिक प्रेमाची. आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी-चांगल्यासुद्धा आणि वाईट घडलेल्या, बिघडलेल्या सगळ्याच घटना बाबांचे विद्यार्थी त्यांना सांगत असत. वडिलांशी भांडण झालं, शेजारी त्रास देतात पासून सारं सारं काही बाबांना सांगत. ते मोठय़ा प्रेमानं ऐकून घेत. त्यावर उपाय सांगत. बाबांचे एक विद्यार्थीमित्र परीक्षेला बसले होते. सांगायचं की सकाळी उठतो, अभ्यास करतो. बाबा एकदा सकाळीच त्यांच्या घरी गेले. हे झोपलेले, पण गुरुजी कधीही घरी येऊन आपली चौकशी करू शकतात या भीतीने नंतर त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. बाबांचे अजून एक विद्यार्थी प्राध्यापक होते. आजारी पडले. वर्गावर शिकविताना आपण कोसळून पडू असं त्यांना वाटे. घर फिरल्यासारखं जाणवायचं. एक अनामिक अस्वस्थता, अजस्र भीती त्यांना वाटे. आत्मविश्वासच गेला होता. बाबांच्या इतर विद्यार्थ्यांनी ही गोष्ट बाबांच्या कानावर घातली.  चौकशी करता लक्षात आलं की या सगळ्या जाणिवांची तीव्रता सकाळी चार-साडेचार वाजता जास्त असते. दुसऱ्या दिवशीपासून बाबा पहाटे चार वाजता त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊ लागले. त्यांना सोबत घेऊन गप्पा मारत फिरायला घेऊन जाऊ लागले. त्यांचे विद्यार्थी त्यांना ‘गुरुजी’ म्हणत. ज्याला त्यांनी आपलं मानलं त्यांच्यासाठी ते अक्षरश: झिजले. यातल्या खूप विद्यार्थ्यांशी माझी थेट ओळख आहे. मी त्यांच्याशी बोलते. त्यांच्या गुरुजींचं गुणसंकीर्तन करताना ते थकत नाहीत आणि ऐकताना मी थकत नाही.

मला माहीत नसलेले आणि बाबांनी ज्यांचं आयुष्य घडविलेलं आहे असे असंख्य विद्यार्थी आहेत. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जेव्हा यापैकी कोणाची भेट होते तेव्हा त्यांच्या मनातली गुरुजींवरची श्रद्धा, त्यांच्या मनातली गुरुजींबद्दलची कृतज्ञता त्यांच्या डोळ्यांत, शब्दांत, भावनेत उतरते. ज्यांनी त्यांना पाहिलं आहे, ऐकलं आहे तेही आणि ज्यांनी त्यांना पाहिलं नाही, ऐकलं नाही फक्त वाचलं आहे असेही त्यांचे विद्यार्थी आजही आमच्या ‘भाग्यनगर’च्या घरी येतात. घराच्या उंबरठय़ावर डोकं टेकवतात. क्षणभर थांबून जातात. बाबा आणि विद्यार्थी यांनी एकमेकांवर केलेल्या प्रेमाला कोणतीही उपमा नाही.

हे सगळं अनुभवताना वाटतं, अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात इतक्या सगळ्या गोष्टी बाबांना कशा काय करता आल्या? पुस्तकं, व्याख्यानांची गणती नाही. साहित्य लेखांची गणती नाही. नोकरी तीही अत्यंत काटेकोर पदधतीने, प्राचार्यपद, विविध संस्थांचा कारभार, या सर्वासोबत त्यांनी जोडलेली माणसं, विद्यार्थ्यांशी असलेलं त्यांचं नातं, त्यांच्या जीवनातील त्यांच्या ‘गुरुजींचं’ अढळ स्थान. सगळंच अलौकिक, विस्मयचकित करणारं!

patkishyamal@gmail.com

chaturang@expressindia.com