संकेत पै

‘उत्कृष्ट’ आणि ‘परिपूर्ण’ या शब्दांत वर वर पाहता फरक दिसत नाही… पण त्यात मनोवृत्तीचा फरक आहे. उत्कृष्टतेचा ध्यास प्रेरणा देतो, व्यक्तीत सुधारणा घडवून आणतो. परिपूर्णतेचा अट्टहास मात्र प्रगतीच्या वाटेवरून दूर ढकलतो. सततचं असमाधान पदरी आणतो. तुम्हालाही आपण, आपलं काम परिपूर्ण नाही म्हणून सारखी हळहळ वाटते का?… मग मानसिकतेला प्रयत्नपूर्वक वळण द्यावं लागेल.

आपल्या आयुष्याला इतरांच्या यशाच्या फूटपट्ट्या लावणं, म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या मागे धावणं! आपण कितीही यश मिळवलं तरी आपल्यापेक्षा जास्त आनंदी, विचारांची अधिक स्पष्टता असलेलं, अधिक श्रीमंत, अधिक लोकप्रिय असं कुणी तरी कायम असणार आहे. अशी सततची तुलना आपल्याला स्वत:बद्दल कधी तृप्तीची भावनाच निर्माणच होऊ देत नाही. मग आपण नेहमी असमाधानी राहतो.

‘सर्वोच्च’पदी पोहोचण्यासाठी आपण करत असलेला पाठलाग ‘परिपूर्णते’ची सक्ती घेऊन येतो. आपल्याला झपाटून टाकतो. आपलं मानसिक आरोग्य आणि एकूणच स्वास्थ्य त्यामुळे धोक्यात येतं. मुलांकडून उदंड अपेक्षा असणारे आई-वडील, शाळा-कॉलेज, ऑफिस, समाजमाध्यमं, सगळीकडून ‘माणसानं (म्हणजे तुम्ही) कसं परिपूर्ण, परफेक्ट असलं(च) पाहिजे,’ असे उपदेशवजा संदेश आपल्यावर आदळत असतात.

आणखी वाचा- स्त्री‘वि’श्व: लढवय्या स्त्रियांपुढचे पेच

‘परिपूर्णतेच्या ध्यासानं आपण झपाटलेले आहोत का?’ असा विचार जर तुमच्या मनात येत असेल, तर तुम्ही खरोखरच तसे असण्याची अधिक शक्यता आहे! मीही एका विशिष्ट पातळीपर्यंत अचूकतेचा आग्रह धरतोच. मी स्टार्टअप्सना आणि लघुउद्याोगांना विपणनविषयक मार्गदर्शनही करतो. त्यात प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक गोष्ट अचूकच असावी, असं मला वाटतं. माझ्या ते नेहमी लक्षात येतं. काही संवेदनशील मुद्द्यांच्या बाबतीत मात्र हा आग्रह मोडून काढण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो.

‘आपण नेहमी सर्व बाबतींत अचूकच असलं पाहिजे,’ यापासून स्वत:ची सुटका करून घेणं खरोखरच अवघड आहे. यात आपला बराच वैचारिक गोंधळ उडू शकतो. मलाही हे लागू आहे! आपल्याला अपयशाची भीती वाटते. त्यावरूनच आपली पारख केली जाईल असं वाटतं. त्यामुळे आपलं वागणं पूर्णत: अचूक असावं, हे कितीही अशक्य वाटलं, तरी आपण भीतीपोटी त्या प्रवाहात स्वत:ला लोटून देतो. परीक्षांत उच्च श्रेणी मिळवणं, ‘अ’ दर्जाच्या कॉलेजात किंवा विद्यापीठात प्रवेश मिळवणं, भक्कम नोकरी-व्यवसाय, कुटुंबाचं पालनपोषण, स्वत:चं घर घेणं, अशा विविध अपेक्षांसह आपण वाढतो. अशा अपेक्षा असणं काही चूक नाहीये, पण जेव्हा अचूकतेचा, परिपूर्णतेचा अनाठायी आग्रह त्याच्या केंद्रबिंदूशी येतो, तेव्हा गाडी रुळावरून घसरते!

सचिन माझा मित्र. मुलखाचा ‘परिपूर्णतावादी’! यशस्विता कशाला म्हणावं, याचं जणू आदर्श उदाहरण म्हणूनच जणू आई-वडिलांनी त्याला वाढवलं होतं. ‘आयुष्यात प्रत्येक गोष्टीत असलेली परिपूर्णता आणि अचूकताच खरा आनंद, समाधान देऊ शकते,’ हा विचार त्यांनी मुलाच्या मनावर पक्का बिंबवला होता. तो वर्गात नेहमी प्रथम क्रमांक मिळवत असे. शिक्षकांकडूनही कौतुक होई. पण तो सारखा मित्रमैत्रिणींना मागे टाकण्याच्या सक्तीच्या तणावात असे.

आणखी वाचा-मनातलं कागदावर : शेवटचे घरटे माझे…

आम्ही आठवीत होतो. चाचणी परीक्षेचे गुण त्या दिवशी कळणार होते. आम्ही दोघं वेगवेगळ्या तुकड्यांत होतो. त्याच्या वर्गाचे सर्व विषयांचे गुण समजले होते आणि स्वत:ची एकूण टक्केवारी त्यानं काढली होती. माझ्या वर्गाचे मात्र एका विषयाचे गुण शिक्षकांनी सांगणं बाकी होतं. पण सचिननं त्यापूर्वीच त्याच्या आणि माझ्या गुणांची तुलना करून एकुणात प्रथम क्रमांक मिळवायचा असेल, तर त्याच्यापेक्षा मला किती गुण अधिक मिळायला लागतील, याचं गणित करून ठेवलं होतं. मला अजूनही ते चित्र स्पष्ट आठवतंय… त्या उरलेल्या विषयाचे गुण माझ्या वर्गात शिक्षक वाचून दाखवत होते आणि वर्गाबाहेर सचिन वेड्यासारखा मला किती गुण मिळालेत हे ऐकायला उभा होता! माझे गुण शिक्षकांनी सांगितले आणि तो अक्षरश: दात-ओठ खात आणि त्रागा करत त्याच्या वर्गाकडे चालू लागला!

शाळेनंतर सचिनशी क्वचितच संपर्क आला. उच्च शिक्षणासाठी त्यानं अमेरिकेत एका विख्यात विद्यापीठात प्रवेश घेतला आणि पदवीधर होऊन एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करू लागला. नंतर एकदा मी कामानिमित्त अमेरिकेत होतो, तेव्हा एका मित्रामुळे जवळपास पंधरा वर्षांनी माझी आणि सचिनची पुन्हा भेट झाली. तेव्हा तो सांगत होता की, तो कितीही यशस्वी असला, तरी परिपूर्णतेच्या दुराग्रहामुळे त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर गंभीर परिणाम झाले होते. परिपक्व, अर्थगर्भ नाती आणि वैयक्तिक व व्यावसायिक जीवनातला समतोल सांभाळताना त्याची फार कसरत होत होती. जशी त्याची व्यावसायिक प्रगती होऊ लागली, तसा परिपूर्णतेच्या अट्टहासाचा तणाव वाढत गेला. साहजिकच त्यामुळे त्याच्या प्रयत्नांचं पाहिजे तसं फळ मिळेना. तो निराश होऊ लागला. कायम स्वत:ची तुलना सहकाऱ्यांशी करताना त्याच्यापेक्षा यशस्वी कोणी दिसलं की, स्वत:तल्या अपुरेपणाची त्याला जाणीव व्हायची. या तणावाचा परिणाम तब्येतीवर होऊ लागला. पण पत्नी आणि मुलीचा त्याला या काळात खंबीर आधार मिळाला आणि आयुष्यातल्या प्राधान्यक्रमाचा, यशाच्या परिभाषेचा तो नव्यानं विचार करू लागला. कालांतरानं त्याच्या लक्षात आलं की, परिपूर्णतेच्या अट्टहासापायी एक भ्रामक आयुष्य जगू पाहात होता; जे कधी अस्तित्वातच नव्हतं! मग त्यानं प्रयत्नपूर्वक या मानसिकतेतून बाहेर पडायचं ठरवलं. स्वत:तल्या उणिवा स्वीकारायला सुरुवात केली.

केटी रासम्यूसन हे परिपूर्णतावादावर संशोधन करतात. त्यांचंही म्हणणं हेच की, ‘परिपूर्णतावाद जीवनप्रवासात आपल्याला मागे ओढतो.’ थॉमस क्युरान आणि अँर्ड्यू हिल यांनी २०१९ मध्ये युनायटेड किंग्डममध्ये एक अभ्यास केला आहे. त्यानुसार परिपूर्णतावादी लोकांना इतरांच्या मान्यतेची फार गरज भासते. नेहमी आपण समाजापासून वेगळे पडलोय, अशी भावना त्यांच्या मनात येत राहते. या संशोधनातली आणखी एक गोष्ट म्हणजे हा अट्टहास साधारण गेल्या तीस वर्षांत लक्षणीयरीत्या वाढला आहे.

आणखी वाचा- ‘ती’च्या भोवती..! जगण्याची खोल समजूत

अनेकांचा असा समज असतो की परिपूर्णता म्हणजे सर्वोच्च दर्जा. म्हणजे सर्वोत्कृष्ट आणि परिपूर्ण यात लोक पुष्कळदा गल्लत करतात. पण त्यात फरक आहे. संशोधन असं सांगतं की, परिपूर्णतावादी मानसिकता असणाऱ्या व्यक्ती इतरांकडून मान्यता आणि त्यायोगे स्वीकारार्हता व प्रेम प्राप्त करण्यासाठी तो आग्रह धरतात. त्यामुळे त्यांना स्वत:ला बरं वाटतं. याउलट सर्वोत्कृष्टतेचा आग्रह वैयक्तिक उद्दिष्ट साध्य करण्याशी आणि बाहेरून मिळणाऱ्या मान्यतेपेक्षा आतून येणाऱ्या प्रेरणेशी संबंधित असतो. अंत:प्रेरणेशी संबंधित असतो. परिपूर्णतेचा अट्टहास बाळगताना आत्मसन्मानाला ठेच लागू शकते, तो प्रकार यात घडत नाही. परिपूर्णतेच्या हट्टामुळे कामातली परिणामकारकता आणि मन:शांती, या दोन्ही गोष्टी आपण गमावून बसतो. याउलट वैयक्तिक गोष्टींमध्ये उच्च दर्जा राखण्याच्या आग्रहामुळे जे काही करू ते सर्व उत्कृष्ट होऊ लागतं.

परिपूर्णतेच्या हट्टामध्ये कामं पुढे ढकलणं, टाळाटाळ, एखादी गोष्ट सुरू करण्याचीच भीती निर्माण होऊ लागते. त्यामुळे आपल्या प्रगतीला खीळ बसते. सर्वोत्कृष्टतेच्या ध्यासामुळे मात्र आपण आपल्या सर्वच गोष्टींचा दर्जा उच्च राहील यासाठी प्रयत्न करतो. स्वत:त सुधारणा, प्रगती घडवून आणू शकतो. जपानमध्ये सुमारे चारशे वर्षं जुना ‘किन्सुगी’ हा कलाप्रकार आहे. यात चिनीमातीच्या, काचेच्या फुटलेल्या भांड्यांचे तुकडे सोनं, चांदी, प्लॅटिनम अशा मौल्यवान धातूंचा वापर करून एकत्र जोडतात. फुटलेली भांडी टाकून देण्यापेक्षा किंवा त्यांचं झालेलं नुकसान लपवण्यापेक्षा या कलाप्रकारात त्यातले दोष ठळकपणे दाखवतात. त्यातल्या अपूर्णतेत असलेल्या सौंदर्याचा सन्मान करतात.

या जपानी प्रथेचं जीवनाशी बरंच साधर्म्य आहे. अवास्तव परिपूर्णतेच्या मागे लागून चुका, अपयशाच्या भीतीनं खचून जाऊन तणाव आणि चिंताग्रस्त होण्यापेक्षा, ‘आपण अपयशी कसे होणार नाही,’ याच एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, ‘किन्सुगी’ विचारधारा स्वीकारणं चांगलं! अपयशातून आलेल्या शहाणपणातून, प्रत्येक चुकीतून प्रगतीची संधी शोधत स्वत:ला अधिक लवचीक बनवण्यात खरा आनंद मिळू शकतो.

आणखी वाचा- माझी मैत्रीण : जीव लावणारी ‘ती’

‘नॅशनल एज्युकेशन असोसिएशन’ परिपूर्णतावादाचा उल्लेख ‘महासाथ’ असा करते. ‘चाईल्ड सायकोथेरपिस्ट असोसिएशन’नं याला ‘मूक आपत्ती’ म्हटलंय. ‘रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रिस्टस्’नं त्याचा उल्लेख ‘संकट’ म्हणूनच केलाय. याचा प्रत्यक्ष प्रत्यय मी माझ्याच बारा वर्षांच्या मुलीच्या बाबतीत घेतला. शाळेचा गृहपाठ, प्रकल्प, वर्गात घडणाऱ्या गोष्टी, या सगळ्यांत तिला नेहमीच ‘परफेक्ट’ राहायचं असतं. केवळ शालेय विद्यार्थ्यांपुरता हा ताण मर्यादित नाही. व्यावसायिक जगतातही असाच ताण जाणवतो. २०१६ मध्ये ‘ऑक्युपेशनल हेल्थ सायकोलॉजी जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार परिपूर्णतेच्या दुराग्रहाचा संबंध कर्मचारीवर्गाचा असंतोष आणि कामाचं कमी होत चाललेलं समाधान, याच्याशी आहे. तर ‘अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन’च्या म्हणण्यानुसार सर्व वयाच्या, सर्व स्तरांतल्या लोकांचा वाढलेला ताण, चिंता, निराशा आणि अगदी आत्महत्येची मनोवृत्ती याच्याशीदेखील त्याचा थेट संबंध आहे.

हे सर्व पुराण सांगितल्यावर प्रश्न असा की, तुम्हाला कधी अगदी ‘परफेक्ट’ रंगरूप असलेला गुलाब पाहिल्याचं आठवतंय का?… किंवा एखादा अगदी प्रमाणबद्ध त्रिकोणी पर्वत? निसर्गानंही जर सर्व गोष्टींचा त्यांच्यातल्या उणिवांसह स्वीकार केलाय, सन्मान केलाय… तर मग परिपूर्णतेचं बंधन आपल्यावरच कशाला?…

sanket@sanketpai.com