‘काहीपण भारी देवा’ हा लेख वाचला. समस्त स्त्री-जातीच्या अनेक समस्यांची उकल करणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील पात्रं खूपच जवळची वाटतात. पूर्वीच्या काळी स्त्री ही खूपच सामाजिक समस्यांना तोंड देत होती. त्यात अनेक समस्या येतात- उदा. मूल नसलेल्या स्त्रियांना समाजात मानाचं स्थान नसणं, समाजातील कोणत्याही मंगल प्रसंगी त्यांना सामावून न घेणं, त्यांना मुद्दाम दूर ठेवणं, इत्यादी. शिवाय घटस्फोटित स्त्रियांच्या जीवनातली घुसमट, घर सांभाळून नोकरी करणाऱ्या स्त्री पात्रांनी आपली आवडनिवड बाजूला सारून मनाच्या खोल गाभाऱ्यातल्या सर्व इच्छा दाबून टाकणं.. या गोष्टींची मंगळागौरीच्या निमित्तानं चित्रपटात उकल होते, हे पाहताना डोळय़ांत पाणी तरळतं. घर, नोकरी, संसार सांभाळताना, कधी वयाचा अर्धा टप्पा पार करताना आयुष्य जगायचं राहिलं, अशी खंत डोळय़ांत अश्रूरूपानं ओघळते. ही तमाम पात्रं स्त्रीच्या दु:खाचं प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच हा चित्रपट लोकप्रिय झाला. तेच त्याच्या यशाचं गमक आहे. – योजना भिसे-रानवळकर
किरण येले यांचा लेख भावला
किरण येले यांचा ‘कलावंतांचे आनंद पर्यटन’ या सदरातील ‘जन्म आणि मृत्यू असतात आसपास’ हा लेख वाचला आणि मला मीच भेटल्याचा अनुभव आला. फ्रेंचमध्ये ‘देजा व्हू’ म्हणतात तसंच काहीसं. देवाबद्दलच्या माझ्या कल्पना तंतोतंत याच आहेत. टर्कीला मी सुलेमानिया मशिदीत नव्यानं झालेल्या एका मित्राबरोबर सर्व नियम पाळून नमाजदेखील अदा केला. माझा स्वरलहरींवर विश्वास आहे, मनापासून केलेल्या प्रार्थनेवरदेखील विश्वास आहे. मी बालरोगतज्ज्ञ आहे, त्यामुळे वेळ काढून खूप फिरलो आहे. बऱ्याच वेळेला एकटा. सिंधूकाठी लडाखच्या आर्यन व्हॅलीतला मुक्काम आणि रात्री तीन वाजता ऐकलेला सिंधूचा खळखळाट अजूनही आठवतोय. आता वय ६६. त्यामुळे राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच चारधाम यात्रा करतो आहे. तीही जन्म आणि मृत्यू आसपास असल्याचा अनुभव देऊन जाते असंच म्हणतात. – डॉ. सुहास चौधरी
चित्रपटांमधून सामाजिक सुधारणेची अपेक्षा चुकीची!
माधुरी दीक्षित यांचा ‘काहीपण भारी देवा’ हा लेख (१९ जुलै) वाचण्यात आला. एखाद्या सांस्कृतिक बाबीचा वापर करून चित्रपट काढणे काही नवीन नाही. तसेच सांस्कृतिक बाबीचा वापर गर्दी जमवण्यासाठीसुद्धा आजकाल होतो. त्यात समाजाला किंवा विशेषत: स्त्रियांना काही वाटत नाही. एखादा सामाजिक विषय, सांस्कृतिक, राजकीय, बौद्धिक विषय घेऊन चित्रपट काढले जातात. दीक्षित यांनी जो मुद्दा मांडला आहे, की अशा चित्रपटांमधून सामाजिक सुधारणेला काही वाव राहील का? या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असंच असेल. एखाद्या सांस्कृतिक विषयाच्या चित्रपटानं सामाजिक परिवर्तन घडून येईल हीच अपेक्षा मुळात चुकीची वाटते. तरीही लेखात खूप चांगले मुद्दे मांडले आहेत.- निलेश मोरे