आजच्या या सदराच्या अखेरच्या लेखात, रत्ना रंगमंच अनुभवाच्या दुसऱ्या अर्ध्या बाजूबद्दल, अर्थात प्रेक्षकांबद्दल चर्चा करतात. अभिनेते काही प्रयोगांच्या वेळी ‘अनुत्साही’ प्रेक्षकांबद्दल तक्रार करतात; टाळ्यांचा अभाव म्हणजे आपले काम नाकारले गेले असा गैरअर्थ काढतात. पण रत्ना यांना वाटते की, प्रेक्षक आनंदासाठी आलेले असतात, जर त्यांचे समाधान झाले नाही तर दोष सादरीकरणाचा असतो, मात्र प्रेक्षकांनीही अभिरुची विकसित करण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांना अभिनेत्यांकडून अधिक अपेक्षा करता येतील.
पुण्यातील ‘श्रीराम लागू रंग-अवकाश’मध्ये सआदत हसन मंटो यांच्या कथेवर आधारित ‘बू’चा नाट्यप्रयोग सुरू असताना मी बॅकस्टेजला होते… ‘बू’ ही कथा साकार करायला अवघड आहे – त्यात कथासूत्र नाही, नाट्यपूर्ण घटना नाहीत; हा ‘मूड’चा शोध आहे, नायकाची अचानक भेट आणि त्याचा परिणाम याचं ‘सेन्स्युअल’ वर्णन आहे. त्याने सगळीकडच्या प्रेक्षकांना चक्रावून टाकलं आहे. ती आमच्या प्रयोगातली पहिली कथा असल्याने ती सादर करणाऱ्या अभिनेत्यासाठी विशेष आव्हानात्मक ठरते आहे… आणि प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं त्याचं काम अधिकच कठीण झालंय. या कथेनंतर सादर होणाऱ्या तिन्ही कथा समजायला जास्त सोप्या असल्याने त्यांना जास्त प्रतिसादही मिळतो, त्यामुळे पहिली कथा सादर करणाऱ्या अभिनेत्याला अधिकच एकटं, अगदीच हरवून गेल्यासारखं वाटतंय… तर त्यावेळी मी विंगेत बसलेली असताना काहीतरी जादू घडली; प्रेक्षक प्रतिसाद द्यायला लागले.
सुरुवातीला संकोचानं- हलकीशी कुजबुज, एक सौम्य हशा, एखादा उसासा, एखाद्या सुंदर ओळीवर एक शांत ‘वाह’ आणि हळूहळू या प्रतिक्रिया अधिक लक्षात येण्याइतपत स्पष्ट होऊ लागल्या. कलाकार आश्वस्त झाला. जोखीम घेण्यास, थांबण्यास, क्षण धरून ठेवण्यास तयार झाला. प्रेक्षकांनी ते चक्र पूर्ण केलं…कलाकार आणि प्रेक्षक दोघंही एकाच ऊर्जेचा प्रवाह अनुभवत होते ‘बू’ ला अखेर त्याचं स्वरूप गवसलं आणि तो एक अर्थपूर्ण संवाद झाला…
नाट्यगृहात, प्रेक्षक अविभाज्य भाग असतात – ते मूक साक्षीदार नसतात; ते त्यात सहभागी असतात. त्यांच्याशिवाय हा अनुभव अपूर्ण राहतो. चित्रपट रिकाम्या सिनेमा हॉलमध्ये दाखवला जाऊ शकतो आणि त्यात काही बदल होणार नसतो,पण प्रेक्षकांविना रंगभूमीवरील सादरीकरण निष्प्राण आणि निरुद्देश असतं. समजुतींची देवाणघेवाण, कलाकार आणि प्रेक्षकांना एकाच वेळी जाणवणारे भावनिक चढउतार, या गोष्टी नाटकाला एक असामान्य अनुभव बनवतात. सर्जनाच्या या क्रियेत प्रेक्षक सहभागी होतात आणि कलाकार तो संवादाचा क्षण अधिक समृद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रतिक्रियांवर पोसला जातो. या प्रतिक्रिया ऐकता येतात (हशा-अश्रू-दाद किंवा भीती) किंवा नाही, पण त्या नजरेतून निसटत नाहीत.
खरं तर एखाद्या नाट्यमय क्षणानंतर पसरणारी शांतता हे कलाकार व प्रेक्षकांत दरम्यान जोडलेल्या बंधाचे, टाळ्या किंवा जल्लोषापेक्षा जास्त अर्थपूर्ण चिन्ह असू शकते. अशा क्षणी आपल्या अस्तित्वाला मोल आहे असं कलाकाराला वाटतं, आपण आपलं काम योग्य पद्धतीने करत आहोत असं वाटतं. डॉक्टर लागूंच्या आत्मचरित्राचे नाव अतिशय चपखल आहे, ‘लमाण’ अर्थात मालवाहक. कारण कलाकाराचे तेच खरे काम असते, नाटककाराच्या कल्पना प्रेक्षकांपर्यंत वाहून नेणे. प्रेक्षक हा त्या कलाकाराबरोबर त्याच जागेत, त्याच क्षणी उपस्थित असतो, हे नाटकाचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे.
समाज आणि संस्कृतीच्या विकासासाठी ही कला आदिम काळापासून मूलभूत राहिली आहे- प्रागैतिहासिक काळातील शिकाऱ्याने आपल्या टोळीसमोर शिकारीचं नाट्य सादर करणं असो, ‘कथाकारां’नी वीरगाथा आणि महाकाव्ये सादर करणं असो, संस्कृत नाटके सादर करणारा ‘कूडियाट्टम’चा उच्च प्रशिक्षित कलाकार असो, किंवा पुण्यात ग्रहणशील प्रेक्षकांसमोर ‘बू’ सादर करणारा आधुनिक शहरी अभिनेता असो. हे सर्वजण एकाच जादूई वर्तुळात गुंफले गेले आहेत. ‘नाट्यशास्त्र’, जे अभिनयाच्या प्रक्रियांबद्दल तपशीलवार वर्णन करते आणि ज्याला पंचम वेद म्हणून संबोधलं गेलं आहे, ते प्रेक्षकाला खूप महत्त्व देते आणि त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवते.
प्रेक्षक हा ज्ञानी आणि उत्साही असावा अशी अपेक्षा आहे, एक ‘सहृदयी’, जो कलाकाराला उत्कृष्ट सादरीकरणासाठी प्रेरित करतो, जो नाटक पाहताना चकित होण्याची आणि भारावले जाण्याची मागणी करतो. जो प्रेक्षक उदासीन असतो, आणि केवळ एकसुरी, निरर्थक करमणुकीसाठी येतो, तो कलाकाराचे काम कंटाळवाणं आणि भकास बनवतो – एक सरासरी बॉलीवूड प्रेक्षक याचे उत्तम उदाहरण आहे. आपण जशा प्रकारचे चित्रपट तयार करतो त्याचं बहुतेक हे एक कारण असावं.
बर्टोल्ट ब्रेख्त या जर्मन नाटककाराच्या नाट्यविचारांनी विसाव्या शतकात युरोपीय रंगभूमीत महत्त्वाचे बदल घडवून आणले. त्यांचा आग्रह होता की भावनाशील सादरीकरणाने प्रेक्षकांना फसवू नये, तर नाटक भोवतालच्या जगाबद्दल काय म्हणतं त्याबद्दल त्यांनी सतत प्रश्न विचारत राहिले पाहिजे. त्यांनी त्यांच्या काळातील लोकप्रिय पण बौद्धिक व भावनिकदृष्ट्या निकृष्ट नाटकांना आव्हान देण्यासाठी स्वत:चा ‘परकेपणाचा सिद्धांत’ (theory of alienation) मांडला. त्यांच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. पण मला ‘एनएसडी’मध्ये (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) असताना जर्मनीचे दिग्दर्शक फ्रिट्झ बेनेव्हिट्झ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची फार छान संधी मिळाली होती.
मी ‘एनएसडी’मध्ये असताना ते ब्रेख्टच्या नाटकांसाठी ‘गेस्ट डिरेक्टर’ म्हणून आले होते. नाटक कसं सातत्याने आणि नेहमीच विचार करायला प्रवृत्त करणारं असू शकतं हे त्यांनी आम्हाला दाखवले. जेर्झी ग्रोटोव्हस्की, पोलंडचे दिग्दर्शक आणि शिक्षक, यांनी कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील एक प्रकारच्या कराराबद्दल सविस्तरपणे लिखाण केलं आहे. एक कलाकार आणि एक प्रेक्षक असतानाच आदर्श नाट्यानुभव मिळतो या टोकापर्यंत त्यांनी त्यांची मतं मांडली. त्यांच्या मते बाकी सर्व काही केवळ दिखाऊपणा असतो आणि अंत:करणापर्यंत होणारा संवाद हेच एकमेव नाटक करण्याचे कारण असते.
मी स्वत: सर्व प्रकारच्या प्रेक्षकांसमोर सर्व प्रकारची नाटकं केली आहेत आणि हे नातं किती महत्त्वाचं आहे हे मला अनुभवावरून माहीत आहे. प्रेक्षक हेच अभिनेता म्हणून माझ्या अस्तित्वाचे कारण आहे आणि कलाकार म्हणून प्रेक्षकांना जशी माझ्याकडून उत्तमपणाची अपेक्षा असते तशीच मलाही प्रेक्षकांकडून अपेक्षा असते. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्याचा मला अधिकार आहे. प्रेक्षकांना नाटकात जे काही मिळतं त्यानं ते किती सहजपणे खूश होतात त्या विचारानं मला दीर्घकाळ छळलं आहे – थोडंसं नाट्य, थोडे हशे, काही अश्रू आणि काही भावनिक कल्पना पुरेशा असतात आणि मी स्वत:ला विचारते की प्रेक्षकांनी अधिक आग्रही होण्यासाठी काय करता येईल.
एक उत्तर आहे प्रेक्षकांना शिक्षित करणं; आणि हे आपल्याला अगदी लहान वयात सुरू करावं लागेल, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये, त्यांना नाटकं बघण्याची आणि आपण जे काही पाहिलं त्यावर विचार करण्याची, चर्चा करण्याची, समीक्षा करण्याची संधी देऊन हे करता येईल. त्यांना नाटकाच्या निर्मितींमध्ये सहभागी होण्याचीही संधी मिळाली पाहिजे, जेणेकरून रंगभूमीच्या बारीकसारीक गोष्टी त्यांच्या आयुष्याचा भाग होतील आणि त्यांनाही त्या जादूचा स्पर्श होईल.
आम्हाला अनेकदा प्रयोगानंतर, आपण पहिल्यांदाच नाटक पाहायला आलो आहोत असं सांगणारे, वयाच्या पन्नाशी आणि साठीतीलही, लोक भेटतात. मला त्यांच्याबद्दल वाईट वाटतं कारण त्यांनी त्यांचं आयुष्य समृद्ध करणारं काहीतरी गमावलेलं असतं. अनेक युरोपीय देशांप्रमाणे ब्रिटनमध्येही शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गामध्येच आणि व्यावसायिक नाटक निर्मिती संस्थांमध्ये नाटकाची ओळख करून दिली जाते. म्हणूनच तिथं नाटक पाहण्याची परंपरा एवढी जिवंत आणि उत्साही आहे यात काही आश्चर्य नाही.
नाटक पाहायला जाणं हे सामान्य माणसाच्या जीवनानुभवाचा एक अविभाज्य भाग कसा आहे याचं महाराष्ट्र हे एक उत्तम उदाहरण आहे. या राज्यातील नाटकं, नाट्य गट आणि नाटककारांची संख्या हा त्याचाच पुरावा आहे. बंगालमध्येही कधी काळी तितकीच समृद्ध आणि चैतन्याने सळसळती रंगभूमी होती, जशी कर्नाटक आणि केरळमध्ये होती. दुसऱ्या बाजूला उत्तर भारतात अशा गुणविशेषणाचा दुष्काळ राहिला आहे. आम्हाला अलिगढमध्ये इस्मत चुगताईंच्या कथा सादर करत असताना विचित्र अनुभव आला होता.
मला असं वाटलं होते की तिथे उर्दू गोष्टींना विशेष प्रतिसाद मिळेल पण प्रेक्षकांना हुल्लडबाजी करताना पाहून मी हादरले होते, कारण रंगमंचावर स्त्रिया होत्या आणि एक फिल्मस्टारसुद्धा. त्यांना नाटकामध्ये जराही रस नव्हता. मी त्यांना नाटक निरक्षर म्हणते आणि त्यावर उपाय आहे त्यांना प्रेक्षक म्हणून अधिकाधिक नाटकं आणि कलाकार दाखवले जावेत. त्यांना असभ्य म्हणून झिडकारणं आणि नाकारणं हे त्यावरील उत्तर नाही.
लोकांना अनेकदा आश्चर्य वाटतं की नाटकांचं चित्रीकरण का करता येऊ नये. खरं तर काही नाटकांचं चित्रीकरण करण्यात आलं आहे आणि ती टीव्हीवर दाखवलीही गेली आहेत, पण अशा चित्रीकरणामुळे मूळ कलाकृतीचं फार मोठं नुकसान होतं. विशेषत: अभिनयाचं खूप नुकसान होतं. कलाकार कृत्रिम वाटतात, पण मुख्य समस्या ही आहे की, अशा सादरीकरणांमध्ये थेट प्रेक्षकांमुळे अनुभवता येणारं चैतन्य, ऊर्जा हे पूर्णपणे हरवतं.
माझ्या मते, रंगभूमीला क्षणभंगुरतेच्या जगातच राहू द्यावं- ज्यांनी प्रत्यक्ष ती जादू अनुभवली अशा उपस्थितांच्या आठवणीत ती कैद व्हावी. माझ्यासाठी, रंगमंचावर शंभू मित्रांना ‘इडिपस’च्या भूमिकेत, डॉ. लागूंना ‘सॉक्रॅटिस’ म्हणून, माझ्या आईला ‘मेना गुर्जरी’ या नाटकात किंवा लालूराम यांना हबीब तन्वीर यांच्या ‘चरणदास चोर’मध्ये पाहणं आणि मग हे अनुभव माझ्या मुलांना किंवा तरुण कलाकारांना सांगणं, हेच खऱ्या अर्थानं आपण ज्या महान परंपरेचा भाग आहोत त्याची जिवंत नोंद करण्याचं काम करतं.
त्यामुळेच आपल्याला ‘सहृदयी’ प्रेक्षकांची गरज आहे जे सहभाग घेतात, ते जे काही रंगमंचावर पाहतात त्याने त्यांच्यात बदल होतो आणि शेवटी ते ती मोहिनी पुढील पिढ्यांना देतात.
प्रेक्षक हे वर्तुळ पूर्ण करतात आणि ते आमच्या सर्जनामध्ये भागीदार असतात.
(सदर समाप्त)
chaturang@expressindia.com