जम्मू-काश्मीरच्या गंदरबाल जिल्ह्यातील अमरनाथ यात्रा मार्गावर मंगळवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बालटाल मार्गावर रेलपत्रा आणि बरारीमार्गा दरम्यान ही दरड कोसळली. चार पुरुष आणि एका महिलेसह पाच यात्रेकरुंचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी अमरनाथ यात्रेमधील तीन भाविकांचा मृत्यू झाला. यात दोन भाविक आंध्रप्रदेशचे आहेत. यंदाच्या वर्षी यात्रेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

थोटा राधनाम या ७५ वर्षीय महिलेचा सकाळी बालटाल येथील बेस कॅम्पमध्ये ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्या आंध्रप्रदेश फिवालयम येथे राहणाऱ्या होत्या. अमरनाथ गुहेजवळ असलेल्या संगम येथे राधा कृष्णा सास्त्री (६५) यांचा सुद्धा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्या सुद्धा आंध्र प्रदेशच्या निवासी आहेत. दरवर्षी भारताच्या वेगवेगळया भागातून मोठया संख्येने भाविक अमरनाथ यात्रेसाठी येत असतात. नेहमीप्रमाणे यंदाही अमरनाथ यात्रा मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ६० दिवसांची ही यात्रा २६ ऑगस्टला संपणार आहे.