काश्मिरातील निवडणुका शांततेत पार पडू दिल्याबद्दल पाकिस्तानचे व दहशतवाद्यांचे आभार मानणाऱ्या मुफ्ती मोहम्मद सईद यांना ते भारतीय आहेत की नाही, असा सवाल करा असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ या नियतकालिकात व्यक्त करण्यात आले आहे. सीबीआयचे माजी संचालक जोगिंदरसिंह यांनी त्यांच्या लेखात सईद यांच्या दुटप्पी भूमिकेवर टीकेचे असूड ओढले आहेत.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मुफ्ती सतत वादाच्या भोवऱ्यात आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या शांततापूर्ण निवडणुकीचे श्रेय पाकिस्तान, फुटिरतावादी आणि अतिरेक्यांना दिले होते. त्यावरून टीका होत असतानाच अतिरेकी अफझल गुरूच्या मृतदेहाचे अवशेष कुटुंबीयांना देण्याची मागणी केली. इतकेच नव्हे, तर देशाविरोधात युद्ध पुकारल्याच्या आरोपासह डझनभर गुन्हे असलेल्या मशरत आलमला शनिवारी तुरुंगातून सोडले.
जोगिंदर सिंह यांनी या लेखात लिहिले आहे, की मुफ्ती यांनी दुहेरी भूमिका घेऊ नये. शिकारी कुत्रा आणि ससा एकत्र चालू शकत नाहीत, असे म्हणत ‘मुफ्ती हे खरोखरच भारतीय आहेत का? असे भाजपने त्यांना ठणकावून विचारावे,’ असेही सिंह यांनी म्हटले आहे.