करोनाबाधित रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढत असले तरी दररोज वाढणारी करोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ४५ हजार ७२० रुग्ण आढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. ३० ते ४० हजारांमध्ये वाढणारी रुग्णसंख्याने आता ४५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाख ३८ हजार ६३५ इतकी झाली आहे. आतापर्यंत सात लाख ८२ हजार ६०६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर चार लाख २६ हजार १६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. चिंता वाढवणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत देशात एक हजार १२९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबळींची संख्या २९ हजार ८६१ इतकी झाली आहे. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे. दिल्लीमध्ये करोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ८४.८३ टक्के आहे. India's #COVID19 case tally crosses 12 lakh mark with highest single-day spike of 45,720 new cases & 1,129 deaths in the last 24 hrs Total #COVID19 positive cases stand at 12,38,635 incl 4,26,167 active cases, 7,82,606 cured/discharged/migrated & 29,861deaths: Health Ministry pic.twitter.com/PsNwAozRT0 — ANI (@ANI) July 23, 2020 राज्यात चोवीस तासांत १० हजार रुग्णवाढ गेल्या २४ तासांत राज्यात १०,५७६ नवे रुग्ण आढळले असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तीन हजारांपेक्षा अधिक रुग्णांचे निदान झाले. दिवसभरात २८० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. सुमारे साडेपाच हजार रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक ३९,३५३ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबई सावरतेय.. मुंबई: मुंबईमध्ये बुधवारी एका दिवसात नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा करोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. १ हजार ३१० नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १ हजार ५६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. दक्षिणेकडील राज्यांत मोठी रुग्णवाढ महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत असली तरी, सुरुवातीच्या टप्प्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणाऱ्या केरळमध्ये रुग्ण वाढू लागले आहेत. तमिळनाडू व आंध्र प्रदेशमध्ये दिवसभरात सुमारे ५ हजार रुग्णांची वाढ झाली. कर्नाटकातही साडेतीन हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये करोनाचे संकट चिंतेची बाब ठरू लागली आहे.