सर्वोच्च न्यायालयात आता केवळ एकच महिला न्यायाधीश उरलेल्या असणे हे अतिशय चिंतानजक असून, याबाबत गांभीर्याने आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांनी शनिवारी व्यक्त केले.

न्या. इंदू मल्होत्रा यांच्या निवृत्तीनिमित्त सुप्रीम कोर्ट यंग लॉयर्स फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात न्या. चंद्रचूड बोलत होते. न्या. मल्होत्रा या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी थेट नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला वकील होत्या.

‘न्या. मल्होत्रा यांच्या सेवानिवृत्तीचा अर्थ असा, की आता सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठात एकच महिला न्यायाधीश उरल्या आहेत. एक संस्था म्हणून माझ्या मते ही बाब अतिशय चिंतानजक आहे. जिच्या निर्णयामुळे प्रत्येक भारतीयाच्या जीवनावर परिणाम होतो, अशी संस्था म्हणून आपण अधिक चांगली कामगिरी करायला हवी’, असे न्या. चंद्रचूड म्हणाले.