उत्तरप्रदेशात भाजपचे वारे वाहात आहे. हे नुसते वारे नसून हे वादळ आहे. निवडणुका घोषित झाल्यानंतर याचे सुनामीत रुपांतर होणार आहे. या सुनामीत ‘सबका’ विनाश नक्की आहे. ‘सबका’ने सगळ्यांना लुटून खाल्ले आहे. ‘स’ म्हणजे समाजवादी पक्ष, ‘ब’ म्हणजे बहुजन समाज पक्ष, ‘का’ म्हणजे काँग्रेस, असे लखनऊ येथील विजय शंखनाद रॅलीला संबोधीत करताना मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की, गुजरातमध्ये १० वर्षात एकही दंगल झाली नाही. पण उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाची सत्ता येताच वर्षभरात १५० दंगली झाल्या आहेत. ‘नेताजी’ गुजरातबद्दल खोटी माहिती पसरवत आहेत. नेताजी मतांचे राजकारण बंद करा आणि विकासाचे राजकारण करा. अखिलेश यादव यांच्या सरकारने गेल्या एक वर्षात 150 दंगली घडवून आणल्या आहेत. तर, गुजरातमध्ये १० वर्षांमध्ये दंगल घडलेली नाही. साधा कर्फ्यू सुद्धा लागलेला नाही. उत्तरप्रदेशात आजही विजेचा तुटवडा आहे. गुजरातमध्ये २४ तास वीज उपलब्ध आहे, या शब्दांत मोदींनी मुलायमसिंहांना प्रत्युत्तर दिले.  लखनऊमध्ये कव्वालीची ताण नाही तर, राजकारणाचे बेसूर सूर ऐकाला मिळतात. येथे आता संगीता ऐवजी गोळीबाराचे आवाज ऐकायला येतात. गोमतीला या सरकारांनी नाला बनवून टाकले आहे. देशाला समृद्ध करायचे असेल तर, प्रथम उत्तरप्रदेश संपन्न झाला पाहिजे. देशाच्या समृद्धीचा पाया उत्तरप्रदेश आहे. उत्तरप्रदेश समृद्ध झाल्यानंतर देशाला समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले.