बाटला हाऊस चकमकीत २००८ मध्ये मारले गेलेले दिल्लीचे पोलीस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना सातव्यांदा मरणोत्तर शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.

१९ सप्टेंबर २००८ रोजी बाटला हाऊस चकमक झाली होती त्यात गंभीर जखमी झाल्यानंतर शर्मा यांचा उपचारावेळी मृत्यू झाला होता. बाटला हाऊस येथे लपलेल्या पाच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ते पथकासह गेले होते. २००९ मध्ये त्यांना अशोकचक्र देऊन गौरवण्यात आले त्यानंतरही अनेकदा त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्यपदके जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडंट नरेश कुमार यांनाही काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद विरोधी मोहिमेत सातव्यांदा शौर्य पदक मिळाले आहे. शौर्य पदकात जम्मू-काश्मीर पोलिसांना एकूण ८१ तर  केंद्रीय राखीव पोलीस दलास ५५ पदके जाहीर झाली आहेत.

एकूण ९२६ पदके जाहीर करण्यात आली.  त्यात शौर्य पदके, विशेष सेवा व इतर पदकांचा यात समावेश आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांना २३ शौर्य पदके मिळाली असून दिल्ली पोलिसांना १६, महाराष्ट्र  १४, झारखंड १२  या प्रमाणे पदके मिळाली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमाडंट कुमार हे काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी पथकात काम करीत होते. त्यांनाही गौरवण्यात आले आहे. हैदराबादच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीचे संचालक व आयपीएस अधिकारी अतुल कारवाल यांना दुसऱ्यांदा गौरवण्यात आले आहे. ५५ शौर्यपदकांपैकी  ४१ जम्मू-काश्मीरला, १४ नक्षलविरोधी कारवायांसाठी छत्तीसगडला मिळाली आहेत. सीमा सुरक्षा दलाचे सहायक कमांडंट  विनय प्रसाद यांना मरणोत्तर शौर्यपदक जाहीर झाले आहे.

हवाई दलातील विंग कमांडर विशाक नायर यांनाही शौर्यचक्र जाहीर करण्यात आले आहे. लष्करातील लेफ्ट. कर्नल कृष्णसिंह रावत, मे. अनिल अरस व हवालदार आलोककुमार दुबे यांनाही शौर्यचक्र जाहीर करण्यात आले आहे.