काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदीविरोधी सूर आळवला असतानाच आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी, न्यायालयाने निर्णय देऊन मोदी यांना निर्दोष ठरविले असल्याने त्यांच्यावर पुन्हा दंगलीबाबत आरोप करीत राहणे चूक असल्याचे विधान केल्याने राजकीय क्षेत्रात बुधवारी खळबळ उडाली. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी पटेल यांच्यावर आगपाखड केली असून मोदीसमर्थक मात्र ‘राष्ट्रवादी’ पटेलांमुळे प्रफुल्लित झाले आहेत.
गोध्रा जळीतकांडानंतर झालेल्या दंगलीबाबत न्यायालयाने दिलेला निकाल स्वीकारण्यात यावा आणि त्याबाबत आणखी प्रश्न उपस्थित करण्यात येऊ नयेत, असे मत पटेल यांनी व्यक्त केल़े  आजच्या युगात कोणत्याही बाबतीत न्याय मिळविण्यासाठी न्यायालय ही अंतिम यंत्रणा आह़े  कोणत्याही विवादास्पद मुद्दय़ावर न्यायालयाच्या निर्णयानंतर पूर्णविराम मिळतो़  त्यामुळे न्यायालयीन यंत्रणेने एखादा निर्णय दिला असेल तर त्याचा आदर करणे आपल्याला बाध्य आह़े  त्यावर आपण पुन्हा प्रश्न उपस्थित करू नयेत, असे पटेल यांनी येथे पत्रकारांना सांगितल़े  

नव्या समीकरणाची नांदी?
विशेष प्रतिनिधी, मुंबई  : काँग्रेसच्या विजयाबद्दल शरद पवार साशंक असतानाच प्रफुल्ल पटेल यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे समर्थन केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवास ‘त्या’ दिशेने सुरू झाला की काय, अशी शंका राजकीय वर्तुळात उमटत असून पटेल यांच्या विधानाला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. पटेल यांनी आपल्या विधानाचा फेरविचार करावा, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मांडली. काँग्रेसच्या विजयाबद्दल पवार यांनी व्यक्त केलेली साशंकता, यापाठोपाठ मोदी यांचे पटेल यांनी केलेले समर्थन हे सारेच राष्ट्रवादीला काँग्रेसबरोबर राहण्यात फारसा रस राहिलेला नाही हेच स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.