पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली असून माझ्या कुटुंबीयांच्या वक्तव्यांचे दाखले देण्यापेक्षा देशातील सध्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. आसाममधील सिल्चरच्या प्रचारसभेत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.
पंतप्रधान या नात्याने मी नरेंद्र मोदी यांचा सन्मान करतो, पण वैयक्तिक पातळीवर टीका करून आंनद घेणाऱ्या पंतप्रधानांनी आपण विचारलेल्या चार प्रश्नांची उत्तरेदेखील द्यावीत, असे प्रतिआव्हान दिले. मी त्यांना विचारलेल्या चार प्रश्नांची उत्तरेही ते देऊ शकत नाहीत, अशा शब्दात राहुल यांनी टीकास्त्र सोडले.
हरयाणात आम्ही सत्तेत असताना शांतता होती आता भाजप सत्तेत येताच तणाव निर्माण झाला. बिहार, मध्य प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेशातही भांडणे लावण्याचा त्यांचा उद्योग आहे असा आरोप राहुल यांनी केला. भाजपमध्ये सत्तेत आल्यावर आसामसाठी काय केले, असा सवालही विचारला.