राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मिठाई वाटप केल्याचे सांगत काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा निशाणा साधला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी महात्मा गांधीच्या हत्येमध्ये संघाचा हात असल्याच्या विधानावर संघाकडून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीवर जोरदार टीका होत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते हर्षद रिझवान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रत्युत्तर दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महात्मा गांधीच्या विचारसणीच्या विरोधात होता. तसेच गांधीवर गोळ्या झाडणारा नथुराम गोडसे या संघाचा सदस्य असल्याची आठवण करुन देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघच गांधी हत्येला जबाबदार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. संघाला रक्तपात हवा असून गांधी विरोधी विचारसरणीच्या संघानेच राष्ट्रपित्याला संपवले. अशी पुस्ती हर्षद यांनी जोडली. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतील प्रचारसभेवेळी राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी गांधींची हत्या केली, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्वंय सेवक संघाने राहुल यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम केलेले नसून, त्याच्याशी संबंधित एका व्यक्तीवर आरोप केले आहेत, असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्राच्या रुपाने सर्वोच्च न्यायालयात दिले होते. मात्र, त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. समाजात द्वेष पसरवून दरी निर्माण करणाऱ्या संघाविरोधात लढणे मी कधीही थांबवणार नाही. असे राहूल यांनी म्हटले होते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2016 रोजी प्रकाशित
महात्मा गांधीच्या हत्येनंतर संघाने मिठाई वाटली होती: काँग्रेस
राष्ट्रीय स्वयंसेवक संघच गांधी हत्येला जबाबदार
Written by लोकसत्ता टीम

First published on: 27-08-2016 at 15:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss distributed sweets the day mahatma gandhiji died