देशात सर्वाच चांगली कामगिरी करणारा मुख्यमंत्री कोण? याबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली आहे. पहिल्या पाच बेस्ट सीएमच्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट झालं असून यामध्ये भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्याच्या नावाचा समावेश नाही. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने याबाबत सर्वेक्षण केलं होतं. याद्वारे त्यांनी देशाचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
या सर्वेक्षणानुसार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तिसऱ्या स्थानी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, चौथ्या स्थानी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि पाचव्या स्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.
दरम्यान, नेहमी चर्चेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना त्यांच्याच राज्यातील जनतेने कमी पसंती दर्शवली आहे. म्हणजेच या तिन्ही मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता कमी आहे.
ओडिशा, दिल्ली, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. तर उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारसहित तीन मोठ्या भाजपाशासित राज्यांची सरासरी लोकप्रियता राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रीय लोकप्रियतेच्या सरासरीपेक्षा अधिक चांगलं काम करत आहेत.
दरम्यान, पाच सर्वाधिक खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी थेटपणे भाजपाचे दोन मुख्यमंत्री आहेत तर भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असलेल्या एका मुख्ममंत्र्याचा समावेश आहे. म्हणजेच खराब कामगिरी करणाऱ्या पाचपैकी तीन मुख्यमंत्री भाजपाचे आहेत. तामिळनाडूत पलानीस्वामींना भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे.
चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री
- नवीन पटनायक (ओडिशा)
- अरविंद केजरीवाल (दिल्ली)
- जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश)
- पी. विजयन (केरळ)
- उद्धव ठाकरे (महाराष्ट्र)
- भूपेश बघेल (छत्तीसगड)
- ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल)
- शिवराजसिंह चौहान (मध्य प्रदेश)
- प्रमोद सावंत (गोवा)
- विजय रुपाणी (गुजरात)
खराब कामगिरी करणारे मुख्यमंत्री
- त्रिवेंद्रसिंह रावत (उत्तराखंड)
- मनोहरलाल खट्टर (हरयाणा)
- कॅप्टन अमरिंदर सिंह (पंजाब)
- के. चंद्रशेखर राव (तेलंगाणा)
- के. पलानीस्वामी (तामिळनाडू)