पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण केलेले काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी मंगळवारी पीओकेत जाऊन दहशतवादी तळांवर भारतीय वायूसेनेने केलेल्या कारवाईचे कौतुक केले आहे. दहशतवाद्यांचा विनाश अनिवार्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 'लोहा लोहे को काटता है, आग आग को काटती है, सांप जब डंक मारता है, उसका एंटीडोट विष ही है. भारतीय वायूसेना की जय हो. जय हिंद जय हिंद की सेना,' असे ट्विट त्यांनी केले आहे. दरम्यान, काही लोकांच्या कृत्यासाठी संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असे वक्तव्य पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सिद्धू यांनी केले होते. या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांना धारेवर धरले होते. काँग्रेसनेही आपल्या अधिकृत वक्तव्यात सिद्धू यांनी देश भावनेनुसार प्रतिक्रिया दिली पाहिजे, असा सल्ला दिला होता.