नवी दिल्ली : आम आदमी पक्ष ‘जाहिरातीचे राजकारण करणारा पक्ष’ असून, या पक्षास ‘अरविंद अ‍ॅडव्हर्टाईझमेंट पार्टी’ म्हणणे अधिक योग्य ठरेल, अशी टीका काँग्रेसने मंगळवारी केली. पक्ष प्रवक्ते अजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की दिल्ली सरकारचे शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासंदर्भातील दावे खोटे आहेत. मात्र, हा पक्ष फक्त जाहिरातींवर भर देत आहे. ते म्हणाले, की आपले काम साध्य झाले, की जनतेच्या हिताचा ‘आप’ला विसर पडतो. या पक्षाला ‘अरविंद अ‍ॅक्चर्स पार्टी’, ‘अरविंद ऐश पार्टी’ असेही म्हणता येईल.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातील तरुणांची माफी मागतील का? जयंत पाटलांचा सवाल

या पक्षाच्या जाहिरातीच्या राजकारणावर भाष्य करणे गरजेचे आहे. २०१५ मध्ये ‘आप’ सरकारने दिल्लीत जाहिरातीच्या माध्यमातून ८१ कोटींचा निधी विविध वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांना दिला. नंतर २०१७-१८ मध्ये ११७ कोटी, २०१९ मध्ये २०० कोटी, २०२१-२२ मध्ये ४९० कोटींच्या जाहिराती दिल्या गेल्या. काँग्रेसच्या शीला दीक्षित यांच्या सरकारच्या कारकिर्दीत जाहिरातीपोटी वर्षभरात फक्त ११ कोटी खर्च केले जात. काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये सत्तेवर आलेले आम आदमी पक्षाचे सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देऊ शकले नाही.

मात्र, त्यांनी वाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या जाहिरातीपोटी ३६ कोटी खर्च केले.  दिल्लीत ‘आप’ सरकारने विद्यार्थी ऋण योजनेच्या जाहिरातींवर १९ कोटी रुपये खर्च केले होते, परंतु या योजनेंतर्गत अवघ्या दोन विद्यार्थ्यांना कर्ज दिले.  शेतकऱ्यांसाठी काढणीनंतर शेतातील उर्वरित पिकांच्या विघटकांच्या (स्टबल डी-कंपोझर) जाहिरातींवर २३ कोटी रुपये खर्च केले, मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पासाठी केवळ पाच लाख रुपयेच खर्च झाले आहेत.