अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना एक हजार कोटी रूपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. रिलायन्सकडून मुंबई उच्च न्यायालयात निरूपम यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली जाणार आहे. मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे बाजारमूल्य ५७७५ कोटी रुपये असताना अदानी उद्योग समूहातील अदानी ट्रान्समिशन कंपनीने १८ हजार ८०० कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप निरूपम यांनी केला होता. या अधिग्रहणामागे पंतप्रधान कार्यालय असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, कंपनीने निरूपम यांचे हे सर्व आरोप खोटे आणि आधारहीन असल्याचे म्हटले आहे. ७२ तासांच्या आत निरूपम माफी मागावी असेही म्हटले आहे. दरम्यान, निरूपम यांनी याबाबत आपण गप्प बसणार नसून लोकहितासाठी पुढेही आवाज उठवू, असे म्हटले आहे.

कंपनीने जारी केलेल्या निवदेनानुसार, निरूपम यांनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या वीजपुरवठा व्यवसायाची अदानी ट्रान्समिशनला विक्रीच्या प्रस्तावाबाबत अनेक खोटे आणि आधारहीन आरोप केले आहेत. हे सरकारद्वारे फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमान खरेदीशी जोडण्यात आले आहे. निरूपम यांनी नोटीस मिळाल्यानंतर ७२ तासांच्या आता माफी मागावी, असे नोटिशीत म्हटले आहे.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या भागधारकांनी मागील महिन्यात कंपनीच्या मुंबईतील व्यवसाय अदाणी ट्रान्समिशनला १८,८०० कोटी रूपयांना विकण्यास मंजुरी दिली होती. या अधिग्रहणानंतर अदानी समूहाकडे मुंबईतील ३० लाख ग्राहकांना १८०० मेगावॉट वीज पुरवण्याची जबाबदारी येणार आहे.

दरम्यान, याबाबत निरूपम यांनी मात्र लोकांसाठी असे मुद्दे नेहमी समोर आणणार असल्याचे म्हटले. एखाद्या व्यवहारात पारदर्शकतेची मागणी करणे म्हणजे अब्रुनुकसानी आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जर अब्रुनुकसानी होत असेल तर होऊ द्या. अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या माध्यमातून त्यांनी मला घाबरवण्यापेक्षा मुंबईतील ३० लाख ग्राहकांवर वीज दरवाढीचा बोजा पडू नये हे त्यांनी निश्चित केले पाहिजे. मुंबई उच्च न्यायालयात यापूर्वीच माझ्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला सुरू असल्याचेही ते म्हणाले.