दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मद्य धोरण प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. ज्यानंतर त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. २१ मार्चच्या रात्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचा जामीनही नाकारण्यात आला. आता त्यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती. तसंच, त्यांना चौकशीकरता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. तब्बल ९ वेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, प्रत्येकवेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं. त्यांना अटक होणार याची खात्री होती. त्यामुळे अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, अटकेतून दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर त्यांना अटक होणार हे स्पष्ट होतं. त्यानंतर त्यांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. अरविंद केजरीवाल हे पहिले असे मुख्यमंत्री आहेत ज्यांना त्यांचा कार्यकाळ सुरु असताना अटक झाली आहे. मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन या त्यांच्या सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दिल्लीतल्या मद्य धोरण प्रकरणातील भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.