महेश सरलष्कर
सप-बसप आघाडीचे पारडे जड; पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजप दक्ष
गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांचे कार्यकर्ते भाजपचे आयात उमेदवार रवी किशन यांच्या प्रचारात उतरले असले तरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्वतचा गड राखू शकतील असे त्यांचे खंदे समर्थकही ठामपणे सांगू शकत नाहीत. गोरखपूरमध्ये योगी राजकीय वर्चस्वासाठी लढाई लढत असून पोटनिवडणुकीतील पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने उपेंद्र शुक्ला या ब्राह्मण नेत्याला रिंगणात उतरवले होते. यावेळीही रवी किशन हा ब्राह्मण उमेदवारच दिलेला आहे. गोरखपूरमध्ये ठाकूर आणि ब्राह्मण समाजातील शत्रुत्व हे पोटनिवडणुकीतील शुक्ला यांच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण मानले जाते. योगी हे ठाकूर असून गोरखपूर मतदारसंघात ब्राह्मणांचे राजकीय वर्चस्व निर्माण होणार नाही याची खबरदारी योगींकडून घेतली जाते, असा आरोप ब्राह्मण समाजाकडून होत असतो. शुक्ला यांच्या प्रचारासाठी योगींची ‘यंत्रणा’ मैदानात उतरली नाही. शुक्ला यांचा पराभव झाल्याने योगींमुळे भाजपचा उमेदवार पडल्याची चर्चा रंगलेली होती. त्यामुळे यावेळी योगींनी रवी किशन या ब्राह्मण उमेदवाराला गोरखपूरमधून उभे केले. मात्र, हा उमेदवार गोरखपूरच्या बाहेरील आणि कमकुवत असेल याची दक्षता योगींनी घेतल्याचे बोलले जात आहे. गोरखपूरच्या मातीतील ब्राह्मण उमेदवार योगींनी रिंगणात उतरवलेला नाही. रवी किशन यांना जिंकून आणण्यासाठी योगींची ‘यंत्रणा’ आता मात्र कामाला लागलेली आहे. रवी किशन जिंकून आले तर ब्राह्मण उमेदवाराला पाडल्याचा ठपका राहणार नाही. शिवाय, ब्राह्मण उमेदवारामुळे गोरखपूरमधील योगींच्या धार्मिक, राजकीय आणि आर्थिक साम्राज्यालाही धक्का लागणार नाही अशी दुहेरी खेळी योगींनी रवी किशन यांच्या उमेदवारीला मान्यता देऊन यशस्वी केल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
गोरखपूरमध्ये योगी यांच्याशिवाय दुसरे नेतृत्वच नाही. मुख्यमंत्री झाल्यावर योगींनी लोकसभेची जागा सोडल्याने त्यांच्या जवळ असलेल्या प्रत्येकालाच लोकसभेची उमेदवारी अपेक्षित होती. त्यातून अंतर्गत नाराजी निर्माण झाली. पोटनिवडणुकीत झालेला गोंधळ भाजप नेतृत्वाने पाहिला आणि यावेळी बाहेरचा उमेदवार दिला, असे योगींच्या नजिक मानले गेलेल्या प्राचार्याचे म्हणणे होते. रवी किशन हे जिंकणार की नाही, हे निकाला दिवशी समजेल. पण, भाजपचा उमेदवार पराभूत झाला तरी योगींना राजकीयदृष्टय़ा कोणताही धक्का बसणार नाही. रवी किशन यांच्या उमेदवारीला फक्त योगींचीच नव्हे मोदी-शहा यांचीही संमती होती. त्यामुळे जय-पराजयाची जबाबदारी एकटय़ा योगींची नाही, भाजपचीही असेल. योगींकडे संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी झाल्या आणि गोरखपूर जिंकले तर काय फायदा? उत्तर प्रदेशपेक्षा गोरखपूर महत्त्वाचे नाही. त्यामुळे योगींसाठी गोरखपूरचा गड राखणे हा प्रतिष्ठेचा मुद्दा नाही, असा युक्तिवाद योगी समर्थक करत आहेत. वाराणसीसह गोरखपूरमध्येही अखेरच्या टप्प्यात १९ मे रोजी मतदान होणार आहे. पण, आत्तातरी वारे सप-बसप आघाडीच्या बाजूने अधिक वाहात असल्याचे दिसते.
इतर मागासवर्गीयांची मते निर्णायक
भाजपचे परंपरागत मतदार मात्र रवी किशन यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करतात. पूर्वी मनोज तिवारी यांना गोरखपूरमध्ये आणले होते आता रवी किशन आले आहेत. बाहेरून आणलेले उमेदवार परत तोंड दाखवायला येत नाहीत. यावेळी गठबंधनला जास्त मते पडतील, अशी प्रतिक्रिया होत आहे. गोरखपूरमध्ये निषाद या ओबीसी समाजाची मते सर्वाधिक असून याच मतदारांवर गोरखपूरच्या उमेदवारांचे भविष्य अवलंबून आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचे प्रवीण निषाद यांनी भाजपच्या उपेंद्र शुक्ला यांना पराभूत करून योगींना धक्का दिला होता. हेच प्रवीण निषाद आता भाजपमध्ये गेले असून त्यांच्या निषाद पक्षानेही भाजपला समर्थन दिले आहे. संत कबीरनगरमधून त्यांना उभे केले आहे.
गोरखपूरमधील जातीय समीकरणे..
गोरखपूर मतदारसंघात सुमारे ४ लाख निषाद मतदार आहेत. दीड लाख मुस्लीम, दोन लाख बिगर यादव ओबीसी आहेत. ब्राह्मण, यादव, ठाकूर प्रत्येकी दीड लाख, एक लाख वैश्य आणि दीड लाख दलित मतदार आहेत.
समाजवादी पक्षाने निषाद समाजातील राम भूवाल निषाद यांना उमेदवारी देऊन निषाद मते विभागणार नाहीत याची दक्षता घेतली आहे. ब्राह्मण अजूनही योगींवर नाराज आहेत.
शिवाय, काँग्रेसने मधुसुदन तिवारी या ब्राह्मण उमेदवाराला रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे भाजपची ब्राह्मण मते काँग्रेस विभागेल. त्याचा फायदा सप-बसप आघाडीला मिळेल असे मानले जाते.