बंगाली अभिनेत्री श्रबंती चॅटर्जीने गुरुवारी भारतीय जनता पार्टी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या वर्षी २ मार्च रोजी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्या पक्षात सामील झाल्या होत्या आणि भाजपाने त्यांना उमेदवारी दिली होती. बंगालच्या राजकारणात भाजपामध्ये पुढाकार घेण्याची क्षमता कमी असून प्रामाणिकपणाचा अभाव आहे, असं कारण श्रबंती चॅटर्जी यांनी पक्ष सोडताना दिलंय. “मी ज्या पक्षाकडून राज्यातील विधानसभा निवडणुका लढवल्या त्या भाजपाशी सर्व संबंध तोडून टाकले आहेत. त्याचे मुख्य कारण बंगालच्या राजकारणात भाजपामध्ये पुढाकार घेण्याची क्षमता कमी असून प्रामाणिकपणाचा अभाव आहे,” असे श्रबंती चॅटर्जी यांनी ट्विट करून म्हटलंय. त्यांनी भाजपमधून राजीनामा दिल्याने आता त्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससोबत जातील का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. तुमच्या मनात ममता दीदींसाठी सॉफ्ट कॉर्नर ठेवत आहे त्यामुळे तुम्ही टीएमसीमध्ये सामील होणार का, या प्रश्नाला उत्तर देताना "हे तर वेळच सांगेल." असं त्यांनी म्हटलंय. श्रबंती चॅटर्जी यांच्या आधी बिस्वजित दास, तन्मय घोष, सौमेन रॉय या तीन आमदारांनी एका महिन्यात भाजपा सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.