BJP MP Brij Bhushan on Raj Thackeray Ayodhya Visit Postponed: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्याची माहिती खुद्द राज ठाकरे यांनीच ट्विटरवरुन दिलीय. राज यांची तब्बेत ठीक नसल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचं सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय. पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे हे अचानक पुणे दौऱ्यावर मुंबईला परतल्यापासूनच त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम देत राज यांनी दौरा स्थगित झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलंय. दरम्यान राज यांचा हा दौरा स्थगित झाल्यानंतर त्यांच्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.नक्की पाहा >> Photos: राज ठाकरेंची पुण्यातील पुस्तकांची शॉपिंग चर्चेत! दीड तास पुस्तकं चाळल्यानंतर २०० पुस्तकांची खरेदी; बिलाचा आकडा… राज नेमकं काय म्हणाले?राज यांनी 'तूर्तास अयोध्या दौरा स्थगित' असं वाक्य असणारी पोस्ट ट्विटरवरुन केलीय. पुढे 'महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच. रविवारी दिनांक २२ मे रोजी सकाळी १० वाजता गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे' येथे असंही या पोस्टमध्ये म्हटलंय. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग यांचा होता तीव्र विरोध आहे. उत्तर भारतीयांची माफी मागा आणि मगच अयोध्याला या अशी ब्रिजभूषण सिंग यांची अट आहे. मात्र आता प्रकृतीसंदर्भातील कारणामुळे तुर्तास राज यांचा हा दौरा रद्द करण्यात आलाय. याबाबत २२ ला पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे भाष्य करतील भूमिका मांडतील असे संकेत राज यांनी ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये दिलेत. बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया."आम्ही पाच जून रोजी अयोध्येमध्ये शरयू नदीत स्नान करणार आहोत. तेथील साधू-संतांसोबत आम्ही पूजा-पाठही करणार आहोत," असं बृजभूषण यांनी सांगितलं आहे. "राज ठाकरेंनी त्यांचा दौरा स्थगित केला असला तरी आम्ही तिथे नक्की जाणार आहोत. आम्ही योगी आदित्यनाथांचा वाढदिवसही तिथे साजरा करणार आहोत," असं बृजभूषण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असणाऱ्या योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस पाच जून रोजीच आहे. यानिमित्ताने भाजपा खासदाराकडून विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. फेसबुकवरुनही त्यांनी यासंदर्भातील एक पोस्ट केलीय. काही दिवसांपूर्वी राज अचानक पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईत परत आले होते. हा दौरा अर्धवट सोडून परत येण्यामागे राज यांना पायाला झालेल्या दुखापतीचं दुखण्याने पुन्हा डोकं वर काढल्याचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. एक ते दीड वर्षांपूर्वी राज यांच्या पायाला दुखापत झाली होती.या दुखापतीसंदर्भात मध्यंतरी त्यांनी उपचार घेतले होते. मात्र आता हा त्रास त्यांना पुन्हा सुरु झालाय. पुण्यातील सभेनंतर राज डॉक्टरांचा पुन्हा सल्ला घेणार आहेत. सल्ल्यानुसार दौऱ्यासंदर्भातील पुढील तारीख आणि धोरण निश्चित केलं जाईल. राज यांच्या पायासंदर्भातील समस्येवर उपचार म्हणून शस्त्रक्रीया करण्याची पुन्हा गरज लागू शकते असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज असल्याचंही सांगितलं जात आहे.