राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दात टिका केली आहे. ‘मी चूक नसतानाही मला तुरुंगात टाकण्यात आले. आता मुख्यमंत्री मला धमकी देत आहेत. माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे की, मी आमदार, महापौर असताना देवेंद्रभाई तुम्ही हाफ चड्डीत शाळेत जात होता मग आता तुम्हाला विचारुन मी भाषण करु का?,’ असा सवाल भुजबळ यांनी श्रीगोंदा येथील सभेत उपस्थित केला.
सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. भाजपवाल्यांनी यापूर्वी एका गांधीची हत्या केली होती आता नगरमध्ये दुसऱ्या गांधीची हत्या करून देशामध्ये यांचा गांधीद्वेष पुन्हा एकदा दिसून आला आहे. भाजपला अनेक मतदारसंघात उमेदवार नव्हते म्हणून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उसन्या लोकांना उमेदवारी दिली आहे. ही पोरे पळवणारी टोळी असून त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. सुजय विखे यांना काँग्रेस व राष्ट्रवादीची उमेदवारी देत असताना सुद्धा त्यांनी भाजपची उमेदवारी घेतल्याने त्यांचा मनात वेगळाच होता हे दिसून आल्याची टिका भुजबळ यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही भुजबळ यांनी चौफेर टीका केली. ते म्हणाले की आम्ही सर्व शेतकरी व या देशातील नागरिक हे मालक आहोत, मतदार हा मालक आहे त्यामुळे आम्ही मालक राहणार, चौकीदार होणार नाही आणि देशाचा सध्याचा चौकीदार हा साधासुधा नसून तो दहा लाख रुपयांचा नुसता सूट घालतो आणि या चौकीदाराच्या काळात संरक्षण विभागांमधून महत्त्वाची कागदपत्रे चोरीला जातात अशा पद्धतीचा चौकीदार आता आपल्या उपयोगाचा नाही. त्यामुळे देशामध्ये आता काँग्रेस व राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचे सरकार येणार असून जनतेनेच मोदी हटाव ही मोहीम हाती घेतली आहे. पंतप्रधान मोदी हे पुलवामासारख्या दुर्दैवी घटनेत सैनिकांच्या नावावर घाणेरडे राजकारण देशामध्ये करीत आहेत अशीही टिका भुजबळ यांनी केली.
मी या भागाचा भूमिपुत्र आहे तेव्हा भूमिपुत्राला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. २३ तारखेपर्यंत सर्व मतदारसंघात पोहोचू शकणार नाही, मात्र पुढील पाच वर्षांमध्ये आपण साधा फोन जरी केला तरी मी आपणासाठी हजर राहील असं आश्वासन उमेदवार संग्राम जगताप यांनी दिले.