कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. कथित मद्य धोरण प्रकरणात १०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसाठी तब्बल नऊ वेळा समन्स बजावण्यात आले होते. पण अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नाहीत, अखेर ईडीने त्यांच्यावर कारवाई केली.

अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर दिल्ली सरकारच्या कारभाराचे काय होणार? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. यावर आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणार असल्याचा दावा केला. यानंतर आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा कारभार तुरुंगातून चालवण्यास सुरूवात केली आहे.

केजरीवाल यांनी तुरुंगातून दिला पहिला आदेश

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगात आहेत, तरीही त्यांनी दिल्लीचा कारभार तुरुंगातून चालवण्यास सुरूवात केली आहे. दिल्ली सरकारच्या जल मंत्रालयाशी संबंधित पहिला आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला. दिल्लीत काही ठिकाणी पाण्याच्या समस्या असून त्या ठिकाणी पाण्याचे टँकर वाढवण्यासंदर्भात केजरीवाल यांनी सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का; ईडीच्या कारवाईविरोधात तातडीची सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

मंत्री आतिशी यांनी काय सांगितले?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून दिलेल्या आदेशासंदर्भात दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. त्या म्हणाल्या, “अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी जल मंत्रालयाशी संबंधित तुरुंगातून आदेश दिले आहेत. हे पाहून माझ्या डोळ्यातही पाणी आले. अशा परिस्थितीत कोण असा विचार करतं? तुरुंगात राहूनही ते दिल्लीच्या लोकांचा विचार करत आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या कामांचा विचार करत आहेत. पण मी तुम्हाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावतीने सांगते, दिल्ली सरकारच्या कामाजावर त्यांचे बारीक लक्ष आहे. ते लोकांची काळजी घेत आहेत.

एवढंच नाही तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सर्व विभागांमध्ये सुरू असलेल्या कामांचा आणि विकासाचा आढावा घेत आहेत. आता उन्हाळा असल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत. त्यामुळे त्या समस्या कशा सोडवायच्या, याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील”, असे मंत्री आतिशी यांनी सांगितले.

तातडीच्या सुनावणीला न्यायालयाचा नकार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत ईडीच्या कारवाईविरोधात तातडीची सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र. अरविंद केजरीवाल यांची ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली.