पीटीआय, गुवाहाटी
काँग्रेसचे लोकसभेचे खासदार गौरव गोगोई यांनी मंगळवारी आसामचे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद म्हणून सूत्रे स्वीकारली. पक्षातर्फे गेल्या आठवड्यात त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती. राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गौरव हे आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र आहेत.
गोगोई यांनी मंगळवारी राजीव भवन या पक्षाच्या राज्य मुख्यालयात मावळते प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांच्याकडून नेतृत्वाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘लढाई सुरू आहे’ अशी घोषणा दिली आणि निवडणुकीच्या तयारीला लागावे असा संदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिला. यावेळी पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र सिंह आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया हे उपस्थित होते.
राज्यातील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी आपल्याला समाजाच्या सर्व घटकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन गोगोई यांनी केले. काँग्रेसला आसाममध्ये सौहार्द आणि सर्वसमावेशक विकास करणारे सरकार आणायचे आहे असे ते म्हणाले. आपला पक्ष समानता आणि समावेशकतेच्या विचारसरणीवर पुढे काम करत राहील असे गोगोई यांनी कार्यमाक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.