काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीआधी बोलताना ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधीच काँग्रेसचं नेतृत्त्व करु शकतात असं वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केल्यापासून पहिल्यांदाच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. राहुल गांधी यांची भविष्यात नेमकी काय भूमिका असणार आहे यावरुन व्यक्त होणारे तर्क-वितर्क तसंच यावरुन सुरु असलेल्या राजीनाम्याचं सत्र याच पार्श्वभुमीवर ही बैठक होणार आहे.

आपल्यामधील एकता दर्शवण्यासाठी काँग्रेसचे मुख्यमंत्री राहुल गांधी यांची भेट घेणार आहे अशी माहिती देताना अशोक गेहलोत यांनी सांगितलं की, ‘सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता फक्त राहुल गांधीच पक्षाचं नेृत्तत्व करु शकतात असं आम्हाला वाटतं, देशाच्या भल्याकरिता तसंच देशवासियांसाठी असणाऱ्या त्यांच्या बांधिलकीची तुलना होऊ शकत नाही’.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘काँग्रेस-शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. याआधीही आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी आम्हा सर्वांची असल्याचं सांगितलं होतं’.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेताना अशोक गेहलोत यांनी सांगितलं की, ‘मोदी सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी झाल्यानंतरही आणि अर्थव्यवस्था खालावत असतानाही भाजपाचा विजय होणे दुर्देवी आहे’.

‘भाजपाने देशभक्तीच्या नावाखाली सरकारी सामग्री आणि आर्थिक संसाधनांचा वापर करत आपलं अपयश लपवलं. पण असं असतानाही काँग्रेस अध्यक्षांनी मुद्द्यांच्या आधारे निवडणूक लढवत कशाप्रकारे भाजपाला कडवी झुंज दिली हे काही लपलेलं नाही’, असंही अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.