Corona Virus Update : देशात पुन्हा एकदा करोनाने डोकं वर काढलं असून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सक्रिय कोविड-१९ रुग्णांची संख्या २,७१० वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक संसर्ग केरळमध्ये झाला आहे. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारतात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, २५ मे रोजी संपलेल्या आठवड्यात संसर्ग पाच पटीने वाढून १,००० चा टप्पा ओलांडला आहे.
आकडेवारीनुसार, केरळमध्ये १,१४७ प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यानंतर महाराष्ट्र (४२४), दिल्ली (२९४) आणि गुजरात (२२३) यांचा क्रमांक लागतो. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी १४८ प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये ११६ प्रकरणे नोंदली गेली आहेत. गेल्या २४ तासांत सात मृत्यूंची नोंद झाली आहे, यामुळे या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतील मृतांची संख्या २२ झाली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. तर दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. तथापि, बहुतेक कोविड प्रकरणे सौम्य असल्याचे नोंदवले गेले आहे आणि घाबरून जाण्याची गरज नाही, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
केरळमध्ये रुग्ण का वाढले?
केरळमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे हे कदाचित राज्याने अधिक चाचण्या घेतल्यामुळे झाले असण्याचीही शक्यता आहे. कोविड प्रकरणांमध्ये अचानक झालेल्या या वाढीला ओमिक्रॉनचे दोन नवीन उप-प्रकार – LF.7 आणि NB.1.8.1 – कारणीभूत असल्याचे मानले जाते. JN.1 हा देशातील प्रमुख प्रकार आहे.
आतापर्यंत, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) LF.7 किंवा NB.1.8 ला चिंताजनक प्रकार (VOCs) किंवा स्वारस्यपूर्ण प्रकार (VOIs) म्हणून वर्गीकृत केलेले नाही. तज्ज्ञांनी असं सुचवले आहे की नवीन प्रकारांमध्ये काही प्रमाणात प्रतिकारशक्ती टाळण्याची क्षमता असू शकते, परंतु ते गंभीर दीर्घकालीन संसर्गास कारणीभूत ठरू शकतात असं सूचित करणारे कोणतेही पुरावे नाहीत. ही लक्षणे सामान्य फ्लूशी मोठ्या प्रमाणात जुळतात. काही लक्षणांमध्ये ताप, नाक वाहणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, थकवा यांचा समावेश आहे.