Rajnath Singh on Indian Navy in Goa INS Vikrant : भारताचे संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांनी आज भारतीय नौदलाच्या ताफ्यातील स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतला भेट दिली. ऑपरेशन सिंदूरचं यश नौदलाबरोबर साजरं करण्यासाठी संरक्षणमंत्री तिथे गेले होते. यावेळी भारतीय नौदलाने अरबी समुद्रात शक्तीप्रदर्शन केलं. त्यानंतर युद्धनौकेवर आयोजित एका कार्यक्रमाद्वारे राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या जवानांना संबोधित केलं. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी नौदलातील जवानांच्या शौर्याचं कौतुक केलं. ते म्हणाले, “भारतीय नौदलाने पूर्ण क्षमतेने कारवाई केली तर पाकिस्तानचे चार तुकडे होतील”.
राजनाथ सिंह म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय नौदलाने कोणताही गाजावाजा न करता केलेल्या कामगिरीद्वारे प्रत्येक भारतीयाला प्रभावित केलं आहे. आपल्या सैन्याने अत्यंत शांत राहून पाकिस्तानी लष्कराला बांधून ठेवण्यात यश मिळवलं आहे. जो शांत राहूनही एखाद्या देशाच्या लष्कराला बाटलीत बंद करून ठेवू शकतो तो जेव्हा बोलू लागेल तेव्हा काय चित्र असेल याची कल्पना करा”.
तर यावेळी कदाचित भारतीय नौदल पाकिस्तानविरोधात ‘ओपनिंग’ करेल : राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री म्हणाले, “यावेळी पाकिस्तानी सैन्याला आपल्या फायर पॉवरचा सामना करावा लागला नाही. मात्र, जगाला माहिती आहे की पाकिस्तानने यावेळी कुठलीही नापाक हरकत (आगळीक) केली तर कदाचित त्यांच्याविरोधात भारतीय नौदल ओपनिंग करू शकतं”. म्हणजेच, यावेळी भारतीय वायूदल किंवा भूदलाच्या आधी भारतीय नौदल पाकिस्तानविरोधात रणशिंग फुंकू शकतं. ते म्हणाले, “१९७१ हे वर्ष भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचं व पराक्रमाचं साक्षीदार आहे. त्यावेळी आपलं नौदल पुढे सरसावलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय नौदलाने पाकिस्तानविरोधात मोर्चा उघडला असता तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते”.
राजनाथ सिंह म्हणाले, “अरबी समुद्रातून भारताने पाकिस्तानला कठोर संदेश दिला आहे. भारताची सागरी सीमा तुमच्या (नौदलाच्या) हातात आहे. तुम्ही इथे आहात म्हणून कोणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्यची हिंमत करत नाही. तुमच्या आजवरच्या कामगिरीबद्दल मी तुम्हाला नमन करतो. मी आज येथे केवळ देशाचा संरक्षण मंत्री म्हणून नव्हे तर, एक कृतज्ञ भारतीय म्हणून आलो आहे. तुमच्या समर्पणाला माझा दंडवत. मी तुमच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि तुमच्या परिश्रमाला सलाम करण्यासाठी येथे आलो आहे”.