मुंबई : भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त करीत जागावाटपाची घोषणा केली. पण जागावाटप जाहीर होताच सांगली, दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघांवरून काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. जागावाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची कबुली देत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वाची समजूत काढली जाईल, असे सांगितले.

महाविकास आघाडीचे जागावाटप गुढीपाडवाच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, संजय राऊत आदी आघाडीचे नेते या वेळी उपस्थित होते. शिवसेना २१, काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी १० जागा लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले. जागावाटपात कळीचा मुद्दा ठरलेली सांगलीची जागा शिवसेना लढवेल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

जागावाटपावरून सांगलीतील काँग्रेसचे नेते नाराज झाले आहेत. उद्या होणाऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत पुढील निर्णय घेतली जाईल, असे जिल्हाध्यक्षांनी जाहीर केले. भिवंडीत राष्ट्रवादीला असहकार्य करण्याची भूमिका स्थानिक काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षां गायकवाड यांनीच नाराजीचा सूर लावला. भाजप आणि मोदी यांचा पराभव करणे हे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे एकच ध्येय आहे. आपण कशासाठी लढतो हे सर्वानी ध्यानात ठेवून आपापसातील हेवेदावे दूर करून आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. आघाडीतील मतभेद गाडावे लागतील, असेही ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>>महिला वकिलासोबत ३६ तासांचा Video कॉल, नार्कोटिक्स चाचणीची बतावणी आणि नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून खंडणीची मागणी!

काल सूर्यग्रहण, अमावास्या आणि मोदींची चंद्रपूरची सभा असा काल विचित्र योग होता. मोदींची पार्टी भाकड अन् भेकडांची जनता पार्टी बनली आहे. राजकीय रोख्यांनी ‘चंदा दो, धंदा लो’ ही त्यांची नीती उघड झाली आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

 राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार म्हणाले, मी अनेक पंतप्रधान पाहिले आहेत. मात्र घटनात्मक संस्थांची इतकी बेइज्जत करणारा पंतप्रधान पाहिला नाही. पंतप्रधान कसा असू नये, याचे मोदी हे उत्तम उदाहरण आहेत.

देशातले तानाशाही सरकार घालवण्यासाठी काँग्रेसने मोठे मन करुन जागावाटपास मान्यता दिली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. भिवंडी, मुंबई व सांगलीत कार्यकर्ते नाराज होणे शक्य आहे. पण, आघाडीचा धर्म आहे असे पटोले यांनी स्पष्ट केले.

या वेळी  समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, माकपचे उदय नारकर, समाजवादी गणराज्य पार्टीचे आमदार कपिल पाटील, शेकापचे सरचिटणीस व आमदार भाई जयंत पाटील, आम आदमी पक्षाच्या प्रीती शर्मा- मेनन, भाकपचे भालचंद्र कांगो आदी हजर होते.

 काँग्रेसमध्ये नाराजी  -पटोले यांची कबुली

सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागांच्या वाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची कबुली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. सांगली आणि भिवंडी या जागांचे वाटप हे विजयाचे सूत्र लक्षात घेऊन व्हायला हवे होते. धारावी, वडाळा, चेंबूर आदी काँग्रेसला अनुकूल असलेला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याबद्दल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षां गायकवाड यांनीही नाराजी व्यक्त केली. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळणे आवश्यक होते, असे मत त्यांनी मांडले.

 जागावाटप

 शिवसेना (२१ जागा) : जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, यवतमाळ-वाशीम, मुंबई दक्षिण-मध्य (साऊथ सेंट्रल), मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण आणि ईशान्य मुंबई.

 काँग्रेस (१७ जागा) : नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर-मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि उत्तर मुंबई.

 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (१० जागा) : बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, िदडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड.

दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघांवरून काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी सुरू केली आहे.

‘वंचित’विषयी अपयश

आम्ही ‘मविआ’ व्यापक करण्याचा प्रयत्न केला. लोकशाही व राज्यघटना रक्षणासाठी ‘वंचित’चे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत यावे, अशी इच्छा होती. त्यांना जागा देऊ केल्या होत्या. पण, शक्य नाही झाले. आंबेडकर यांच्याविषयी आदर आहे. त्यांच्यावर टीका करणार नाही. अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

आम्ही नकली मग अमित शहा ‘मातोश्री’वर का आले

काँग्रेसबरोबर असलेली शिवसेना नकली असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चंद्रपूरमधील जाहीर सभेत केली होती.

‘आम्ही नकली आहोत, मग ‘मातोश्री’वर लोटांगण घालायला अमित शहा का येत होते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.