कंबोडिया या देशामध्ये तब्बल ५ हजार भारतीय अडकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ५ हजार भारतीयांची फसवणूक करत त्यांना नोकरी आणि इतर काही गोष्टींचे आमिष दाखवून गुलाम बनवण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये अधिकारी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत लाखो रूपये उकळल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. कंबोडियामध्ये ५ हजारांहून अधिक भारतीयांना वेठीस धरण्यात आले असून त्यांच्याकडून चुकीचे कामे करून घेतले जात आहे. कंबोडियामध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी आता केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

कंबोडिया हे एक सायबर गुलामगिरीचे केंद्र मानले जाते. कंबोडियामध्ये अडकलेल्या या लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध काम करण्यास भाग पाडले जात असून त्यांच्याकडून सायबर फसवणुसारखे कामे करून घेतले जाते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कंबोडियातील लोक जास्त करून भारतीयांनाच फसवत असल्याचा अंदाज आहे.

भारतीयांची सुटका करण्यासाठी प्रयत्न

भारत सरकारच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर सुरक्षेसंदर्भातील अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत कंबोडियामध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच कंबोडियात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी काय रणनीती तयार करता येईल? यासंदर्भात चर्चा झाली.

हेही वाचा : Video: “आपण एआयशी स्पर्धा करायला हवी, त्याला सांगायला हवं की…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बिल गेट्स यांच्याशी AI वर संवाद!

सहा महिन्यांत ५०० कोटी रुपयांची फसवणूक?

‘इंडियन एक्स्प्रेस’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या या बैठकीचा अजेंडा हा या रॅकेटसंदर्भात चर्चा करणे आणि तेथे अडकलेल्या लोकांना परत आणणे हा होता. तसेच गेल्या सहा महिन्यांत कंबोडियामधून सायबर फसवणुकीतून भारतात ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

कशी होते फसवणूक?

डेटा एन्ट्री सारख्या नोकरीचा बहाणा देत काही एजंट लोकांमार्फत कंबोडियाला पाठवले जात असल्याचे आतापर्यंत झालेल्या काही गुन्ह्याच्या माध्यमांतून केंद्रीय यंत्रणांच्या तपासात उघड झाले आहे. त्यानंतर फसवणूक झालेल्या व्यक्तीला सायबर फसवणूक करण्यास भाग पाडले. यामध्ये बहुतांश लोक दक्षिणेकडील असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

आठ जणांना झाली होती अटक

गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी ओडिशा पोलिसांनी सायबर क्राईमचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले होते. कंबोडियामध्ये लोकांना नेण्यासाठी सहभागी असलेल्या आठ जणांना अटक करण्यात आली होती. या कारवाई संदर्भात एका अधिकाऱ्याने माहिती देताना म्हटले होते की, केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीवर हे प्रकरण आधारित आहे. त्याची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक झाली होती. यानंतर आम्ही देशाच्या विविध भागातून आठ जणांना अटक केली. यानंतर या घोटाळ्यात सहभागी असलेल्या अनेकाविरुद्ध नोटीसा जारी केल्या होत्या.

आतापर्यंत तिघांना परत भारतात आणण्यात यश

कंबोडिया अडकलेल्यांपैकी आतापर्यंत तिघांना पुन्हा भारतात आणण्यात यश आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले होते. कर्नाटक सरकारच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कंबोडियामध्ये अडकलेल्या राज्यातील तीन लोकांना भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले. मात्र, ज्या तिघांना पुन्हा भारतात आणण्यात आले त्यांनी सांगितले होते की, तब्बल २०० लोक कंबोडियात अडकले आहेत.