Siddaramaiah On RCB Victory Parade Bengaluru Stampede : कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये आज आरसीबीच्या विजयी परेड दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत किमान ११ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आहे. तसेच १५ पेक्षा जास्त जण या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेची उपायुक्तस्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय म्हणाले?

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं की, “चिन्नास्वामी स्टेडियमची आसन क्षमता ३५ हजार आहे. मात्र, या ठिकाणी तब्बल २ ते ३ लाख लोक स्टेडियममध्ये जमा झाले होते. अशा प्रकारची घटना घडेल असं कोणालाही वाटलं नाही. मात्र, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई देण्यात येईल. तसेच जखमींना मोफत उपचार देण्याचे आदेशही दिले आहेत”, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं आहे.

घटना नेमकं कशी घडली?

आरसीबीच्या विजयी परेडच्यादरम्यान बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. स्टेडियमच्या बाहेर देखील मोठी गर्दी झाली होती. यावेळी गर्दी कमी व्हावी म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जातं. मात्र, यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेत १५ पेक्षा जास्त जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

‘घटनेची न्यायालयीन चौकशी करा’ : भाजपा

चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजपाचे नेते बीवाय विजयेंद्र म्हणाले की, “या दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी कर्नाटक सरकारने घेतली पाहिजे. जेव्हा संपूर्ण देश कर्नाटक आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे, तेव्हा कर्नाटक सरकारने कोणतीही पूर्व तयारी न करता विजय रॅली काढण्याची घाई केली.त्यामुळे ही दुर्घटना घडली. कर्नाटक सरकारने पूर्वतयारी केली नाही, कारण त्यांना फक्त प्रसिद्धीमध्ये रस होता. याचा परिणाम या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला. या घटनेची न्यायालयीन चौकशी केली पाहिजे”, असं भाजपाचे नेते बीवाय विजयेंद्र यांनी म्हटलं आहे.