अलवर सामुहिक बलात्कारप्रकरणी राजकारणाचा आरोप करताना बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक आरोप केले आहेत. आपल्या पत्नीला राजकारणासाठी ज्यांनी सोडले ते इतर महिलांचा सन्मान कसा करणार? अशा शब्दांत त्यांनी मोदींवर हल्ला केला आहे. इतकेच नव्हे भाजपा नेते मोदींकडे जातात, तेव्हा त्यांच्या बायका घाबरतात अशा शब्दांत मायावतींनी जळजळीत टीकाही केली. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
Mayawati, BSP: Mujhe toh yeh bhi maloom chala hai ke BJP mein khash kar vivahit mahilayen apne aadmiyon ko Shri Modi ke nasdik jate dekh kar, yeh soch kar bhi kafi zyada ghabrati rehti hai ke kahin yeh Modi apne auraat ki tarah humein bhi apne pati se alag na karwa de. https://t.co/zBBmQhQepo
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 13, 2019
मायावती म्हणाल्या, नरेंद्र मोदी पहिल्यांदा अलवरच्या महिला अत्याचार प्रकरणार शांत होते. मात्र, मी याप्रकरणी बोलल्यानंतर त्यांच्यातील घाणेरड्या राजकारण्याची वृत्ती जागी झाली. यामुळे निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फायदा व्हावा असाच त्यांचा यामागचा हेतू आहे आणि ही खूपच लाजिरवाणी बाब आहे. ज्यांनी आपल्या निर्दोष पत्नीला राजकीय फायद्यासाठी सोडलं ते इतरांच्या बहिणी, मुली आणि पत्नींचा सन्मान कसा करतील, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
मायावती पुढे म्हणाल्या, मला तर हे देखील कळालं आहे की, भाजपा नेत्यांच्या पत्नींना याची जास्त भीती वाटते की, त्यांचे पती मोदींच्या जास्त संपर्कात राहिले तर मोदी आपल्या पतीला आपल्यापासून वेगळे करतील.
यापूर्वी भाजपा शासित राज्यांमध्ये जेव्हा दलितांवर अत्याचार झाले तेव्हा मोदींनी तिथल्या मुख्यमंत्र्यांचे राजीनामे मागितले नाहीत. रोहित वेमुला प्रकरणात तर त्यांनी आपल्या केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामाही घेतला नाही किंवा आपली नैतिक जबाबदारी मान्य करीत राजीनामा मागण्याचे कष्टही घेतले नाहीत, असा आरोपही यावेळी मायावती यांनी केला. त्यामुळे मोदींना इतर कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला अलवरच्या घृणास्पद घटनेबाबत सल्ला देण्याचा नैतिक अधिकार नाही. आमचा पक्ष पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायमच तत्पर असतो, असे त्या यावेळी म्हणाल्या.