सीमेवरील शस्त्रसंधीचा भंग होण्यास भारतच जबाबदार असल्याचा उलटा कांगावा करून भारताने पाकिस्तानच्या लष्कराच्या सहनशक्तीचा अंत बघू नये, असा ‘इशारा’ देत माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी लष्करास चुचकारण्याचा शनिवारी प्रयत्न केला. नियंत्रण रेषेवर भारताकडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन हे एकूणच उपखंडास चांगले नसून ते निषेधार्हच आहे, असेही भारताला बजावण्यास मुशर्रफ विसरले नाहीत.
भारताने आमच्या लष्कराच्या सहनशक्तीची परीक्षा बघू नये, असे आपले मत असल्याचे मुशर्रफ यांनी आवर्जुन सांगितले. नियंत्रण रेषेनजिक गेल्या काही काळात वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून दोन्ही देशांची सरकारे त्यासाठी परस्परांवर दोषारोपण करीत असतात. परंतु याच कारणामुळे उभय देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे, असे मुशर्रफ यांनी ‘एक्स्प्रेस न्यूज’ शी बोलताना सांगितले.