थ्री इडियट्स या हिंदी सिनेमातून प्रकाशझोतात आलेले शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळं खळबळ उडाली आहे. लडाख प्रदेशात ग्लेशिअर वितळत असल्यानं येथील नागरिकांना उणे तापमानातील थंडीचा सामना करावा लागत आहे. येथील हिमनद्यांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने तातडीनं संरक्षणात्मक पावले उचलावीत, अशी मागणी वांगचूक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. हिमनद्यांच्या गंभीर समस्येवर सकारात्मक मार्ग काढला नाही, तर येथील नागरिकांच्या जीवनावर परिणाम होईल. लडाखमधील दोन तृतियांश हिमनद्या नष्ट होतील. त्यामुळे येथील नागरिकांसाठी संरक्षणासाठी वांगचूक आक्रमक झाले असून ते उपोषण करणार आहेत.

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. येत्या २६ जानेवारीपासून ५ दिवस उणे ४० अंश तापमानात वांगचूक उपोषणाला बसणार आहेत. ट्वीटरवर पोस्ट शेअर करत त्यांनी क्वायमेट फास्ट असं हॅशटॅगही दिलं आहे. लेह-लडाखमधील नागरिकांच्या समस्या तसेच इतर प्रश्नांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे, यासाठी त्यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. लडाखमध्ये सर्वकाही ठीक नाहीय, “All is not well” असं त्यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे.

नक्की वाचा – Uttar Pradesh BJP : आगामी निवडणुकांसाठी उत्तर प्रदेश भाजपाने कसली कंबर; ‘गुजरात मॉडेल’द्वारे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणार!

लडाखच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वी आश्वासने दिली होती. मात्र अजूनही तेथील प्रश्न मार्गी न लागल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. उपोषणातून जर मी वाचलो तर भेटू…असं वांगचूक यांनी म्हटलं पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

इथे पाहा व्हिडीओ