Sonam Raghuvanshi Case Updates: मेघालयमध्ये हनिमूनदरम्यान राजा रघुवंशीच्या हत्येच्या आरोपाखाली मध्य प्रदेशातून चौघांना अटक करण्यात आली आहे. याचबरोबर, या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती राजाची हत्या करण्यासाठी सोनम रघुवंशीने मारेकऱ्यांना १५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. तिने राजाची हत्या झाल्यानंतर आरोपींना पैसे देण्याचे मान्य केले होते.
“राज कुशवाह याने राजा रघुवंशीच्या हत्येसाठी शेवटच्या क्षणी सोनमला नकार दिला होता. तसेच मेघालयला जाण्याचा त्यांचा बेतही रद्द केला होता. याचबरोबर त्याने इतर तिघांनाही मेघालयला जाऊ नये असे सांगितले होते, परंतु सोनमने त्यांची तिकिटे बुक केल्यानंतर ते मेघालयला गेले होते. शेवटच्या क्षणीही तिघांनी मारण्यास नकार दिला, परंतु सोनमने हट्ट धरला आणि त्यासाठी १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. पोलीस या दाव्यांची पडताळणी करत आहेत,” असे मेघालय पोलिसांसोबत या प्रकरणाचा तपास करणाऱ्या इंदूर येथील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले आहे.
या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याने असेही सांगितले की, सोनमन मारेकऱ्यंना सुरुवातीला १५,००० रुपये रोख दिले होते, जे तिने गुन्ह्यादरम्यान थेट तिच्या पतीच्या पाकिटातून घेतले होते.
पूर्व खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेक सायम म्हणाले की, “एफआयआरमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की राजाची हत्या चाकूने करण्यात आली होती. याचबरोबर त्याच्या मौल्यवान वस्तू पळवण्यात आल्या होत्या. सोनमचा मारेकऱ्यांना पैसे देण्यात आणि नंतर मोठी रक्कम देण्यामध्ये सहभाग यातून तिने हा कट रचल्याचे स्पष्टपणे संकेत मिळत आहेत. आम्ही याची सत्यता तपासण्यासाठी सर्व पुराव्यांचे विश्लेषण करत आहोत.”
दरम्यान या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातील गाझीपूर पोलिसांनी सोनम रघुवंशीला एका ढाब्यावरून अटक केली होती. त्यानंतर इंदूर पोलिसांनी सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि त्याच्या इतर तीन साथीदारांना अटक केली.
आरोपींनी मान्य केला गुन्हा
“चारही आरोपींनी राजा रघुवंशी याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. राजा रघुवंशींवर पहिला वार विशाल उर्फ विकी ठाकूरने केला. चौकशीदरम्यान आरोपींनी राजा रघुवंशींवर कसा हल्ला केला आणि नंतर त्यांचा मृतदेह खोल दरीत कसा फेकला, याचीही माहिती दिली आहे”, असे पोलीस अधीक्षक पूनम चंद यादव यांनी इंडिया टुडे टीव्हीशी विशेष संवाद साधताना सांगितले.