Ahmedabad Plane Crash अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा टेक ऑफनंतर अवघ्या पाच मिनिटांत अपघात झाला. या अपघातात २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. दरम्यान भूमी चौहान नावाची तरुणी अजूनही अपघाताच्या धक्क्यातून सावरते आहे. ती याच विमानाने प्रवास करणार होती पण तिचं फ्लाईट १० मिनिटं उशीर झाला म्हणून चुकलं. दैव बलवत्तर होतं म्हणून तिचा जीव वाचला. भूमी चौहान या लंडनमध्ये स्थायिक झाल्या आहेत. त्या त्यांच्या घरी चालल्या होत्या. त्याबाबत त्यांचं त्यांच्या नवऱ्याशी बोलणंही झालं होतं. मात्र त्यांना या विमानाने जाता आलं नाही. कारण त्यांना पोहचण्यासाठी १० मिनिटांचा उशीर झाला.
विमानात नेमके किती प्रवासी, क्रू मेंबर्स होते?
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, अशी माहिती डीजीसीएच्या निवेदनात देण्यात आली आहे. त्याशिवाय, या विमानात २ वैमानिक व १० केबिन क्रू मेंबर्स होते, असंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. कॅप्टन सुमीर सभरवाल हे या विमानाचे वैमानिक होते. त्यांना ८ हजार २०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे. त्याशिवाय केबिन क्रूलादेखील ११०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे, असं एअर इंडियाने निवेदनात म्हटलं आहे.
भूमी चौहान यांनी काय सांगितलं?
“मी अहमदाबाद एअरपोर्टवरुन लंडनला जाणाऱ्या त्या विमानातूनच प्रवास करणार होते. मी सुट्टीसाठीच आले होते. विमान अगदी वेळेत निघालं. मला १० मिनिटांचा उशीर झाला. त्यानंतर ही घटना घडली. मी घरी आले आहे, गणपती बाप्पानेच मला वाचवलं अशा माझ्या भावना आहेत. मी अजूनही थरथरते आहे, मला काय बोलावं हेदेखील सुचत नाही. मला वाहतूक कोंडीमुळे थोडा उशीर झाला. माझं फ्लाईट मिस झालं म्हणून मी एअर पोर्टवरुन आता घरी आले आहे. पण तिथे खूपच गोंधळ होता. जी घटना घडली ती घटना ऐकून, ती दृश्य पाहून मी पूर्णपणे ब्लँक झाले आहे, मला काहीही सुचत नाही. मी त्या विमानात बसलेल्या लोकांसाठी आता प्रार्थना करते आहे.” असं भूमी यांनी चौहान यांनी टाइम्स नाऊला सांगितलं.
विमानाने टेक ऑफ घेताच काही वेळातच अपघात
अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात आज सकाळी एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्यामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. हे विमान निवासी परिसरात कोसळल्यामुळे यात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता विमान अपघातामागचं नेमकं कारण काय होतं? याविषयी माहिती घेतली जात आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही बसले होते अशीही माहिती समोर आली आहे.