ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हवाई दलाला चांगलाच दणका दिला आहे. विश्लेषणानुसार असे समोर आले आहे की, भारतीय हवाई दलाने हवेतून सोडलेल्या क्रूझ क्षेपणास्त्रांनी आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानी हवाई दलाची ६ लढाऊ विमाने, दोन उच्च-मूल्याची विमाने, १० हून अधिक यूसीएव्ही, एक सी-१३० वाहतूक विमान आणि अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत.
पाकिस्तानी आक्रमणाविरुद्ध सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या सूत्रांनी एएनआयला सांगितले की, भारतीय हवाई दलाकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या तांत्रिक विश्लेषणानुसार ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी हवाई दलाची सहा लढाऊ विमाने हवेत पाडण्यात आली आहेत.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान एस-४०० क्षेपणास्त्र बचाव प्रणाली ‘सुदर्शन’ ने सुमारे ३०० किमी अंतरावर केलेल्या लांब पल्ल्याच्या हल्ल्यात पाकिस्तानी हवाई दलाचे इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर्स विमान नष्ट केले आहे.
चार दिवसांच्या संघर्षादरम्यान भोलारी एअरबेसवर, हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करून केलेल्या हल्ल्यात स्वीडिश मूळचे पाकिस्तानी विमान नष्ट झाले आहे, अशी माहितीही सूत्रांनी एएनआयला दिली आहे.
या चार दिवसांच्या संघर्षात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या भोलारी एअरबेसवर एअर-टू-सर्फेस क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात स्वीडिश तंत्रज्ञानावर आधारित आणखी एक एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल विमान नष्ट झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, या एअरबेसच्या हँगरमध्ये आणखी लढाऊ विमाने होतीत, परंतु पाकिस्तानने अद्याप तेथून नष्ट झालेल्या विमानांचे अवशेषही हटवलेले नाहीत. त्यामुळे जमिनीवर उभ्या असलेल्या विमानांचे नुकसान सध्या तरी निश्चित झालेले नाही.
भारतीय हवाई दलाच्या रडार आणि हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीने पाकिस्तानी लढाऊ विमानांचा मागोवा घेतला आणि जेव्हा क्षेपणास्त्रे धडकली तेव्हा ही विमाने अचानक रडारवरून गायब झाली. यावरून ती विमाने नष्ट झाल्याचे स्पष्ट होते. याशिवाय, पाकिस्तानचे एक सी-१३० वाहतूक विमान देखील ड्रोन हल्ल्यात पाडण्यात आले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. त्यानंतर ६–७ मे रोजी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष सुरू झाला. भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांत झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे पाकिस्तानने १० मे रोजी दुपारी शस्त्रविरामाची विनंती केली, आणि त्यानंतर हा लष्करी संघर्ष थांबला.