गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत पेड न्यूजचा यथेच्छ वापर करण्यात आला, असा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या सत्यशोधन समितीचा दावा असल्याचे कौन्सिलचे अध्यक्ष मरकडेय काटजू यांनी सांगितले.
पेड न्यूजचे प्रकार अनेक ठिकाणी दिसले ही बाब धक्कादायक व अस्वस्थ करणारी आहे, असे सांगून काटजू म्हणाले की, आपण पेड न्यूजचा छडा लावण्यासाठी जी समिती नेमली होती त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे प्रसारमाध्यमात केवळ स्वनियंत्रण हे प्रभावी ठरते आहे असे वाटत नाही.
प्रेस कौन्सिलचे सदस्य राजीव रंजन नाग हे पेड न्यूजच्या तक्रारींचा अभ्यास करणाऱ्या या समितीचे निमंत्रक होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ वृत्तपत्रेच नव्हेत तर दूरचित्रवाणी वाहिन्याही यात सामील आहेत. काटजू म्हणाले की, पेड न्यूजबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला जाणार असून संबंधित नेत्यांवर कारवाईची मागणी केली जाणार आहे.
पेड न्यूजचा वापर करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका आमदाराची निवड रद्द करण्यात आली होती तसेच याबाबतीतही करावे, अशी मागणी करणार असल्याचे काटजू म्हणाले. चुका करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना शिक्षा करण्याचे अधिकार मीडिया कौन्सिलला द्यावेत, कारण माध्यमांचे प्रभावी नियंत्रण करणे गरजेचे आहे असे सांगून काटजू म्हणाले की, स्वनियंत्रण हे निष्प्रभ ठरले आहे व गुजरात निवडणुकात त्यांचे ताजे उदाहरण सामोरे आले आहे व हा केवळ अपवाद नाही.