PM Modi Against Terrorism: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर शेजारी देश एकमेकांविरुद्ध कारवाई वाढवत असतानाही, दहशतवाद आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध “कठोर आणि निर्णायक कारवाई” करण्यास भारत वचनबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्काल्व्हेस लॉरेन्को यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना त्यांनी हे विधान केले आहे. लष्कर-ए-तैयबाची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. दरम्यान, या हल्ल्यातील चार हल्लेखोरांपैकी दोघे पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी झाली आहे.
पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंत…
हल्ल्याच्या एक दिवसानंतर २३ एप्रिल रोजी झालेल्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी इशारा दिला होता की, भारत पीडितांन न्याय मिळवून देण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. “आम्ही प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना शोधून काढू आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करू. आम्ही पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंत त्यांचा पाठलाग करू,” असे ते म्हणाले होते.
भारताची कठोर पाऊले
पहलगाम हल्ल्यानंतर कठोर उपाययोजना म्हणून, भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. अटारी सीमा बंद केली असून, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द केले आहेत. याचबरोबर अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल आणि एक्स हँडल्सवर भारतात बंदी घालण्याची कारवाई सुरू केली आहे. दुसरीकडे पाकिस्ताननेही भारतीय विमान कंपन्यांसाठी त्यांची हवाई हद्द बंद केली आहे. याचबरोबर पाकिस्तानी राजकीय नेते भारताविरोधात चिथावनीखोर विधाने करत आहेत.
पाकिस्तानी वस्तूंची आयात रोखली
दरम्यान भारताने आता पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
भारताच्या या निर्णयाचा फटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. या बंदीच्या निर्णयाअंतर्गत पाकिस्तानमधून येणाऱ्या कोणत्याही उत्पादनाच्या आयातीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानमधून एखादी वस्तू आयात होणारी असो किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्या कोणत्याही देशातून पाकिस्तानी वस्तू भारतात आयात होणार असेल तर त्यावरही बंदी असणार आहे.