BJP Mega Maharashtra Campaign, Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. आज (८ एप्रिल) त्यांनी भाजपाचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी चंद्रपुरात प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेससह शिवसेनेच्या ठाकरे गटावर सडकून टीका केली. मोदी म्हणाले, चंद्रपुरात उन्हाचा पारा वाढतो आहे, तसंच राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. परंतु, तुमचा (नागरिक) जोश, उत्साह अजिबात कमी झालेला नाही. या वेळी चंद्रपूरने ठरवलं आहे ‘फिर एक बार ४०० पार’… याच चंद्रपूरने राम मंदिराच्या निर्मितीसाठी आणि संसदेच्या नवीन इमारतीसाठी लाकडं पाठवली आहेत हे आम्ही विसरलो नाही.

नरेंद्र मोदी म्हणाले, देशात एका बाजूला भाजपाप्रणित एनडीएचं सरकार आहे, ज्यांना केवळ देशासाठी कठोर आणि भक्कम निर्णय घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि इंडी आघाडी आहे ज्यांचा एकच मंत्र आहे, जिथे सत्ता मिळेल तिथली मलाई खाऊन टाकणे… इंडी आघाडीने देशाला नेहमीच अस्थिर ठेवलं आहे. एक स्थिर सरकार का आणि किती गरजेचं असतं ते या महाराष्ट्राशिवाय दुसऱ्या कोणाला कळणार? इंडी आघाडीचं केंद्रात सरकार होतं तोवर महाराष्ट्राची उपेक्षा होत राहिली. इंडी आघाडी कट रचून, जनादेश बाजूला ठेवून सत्तेत आली तेव्हा स्वतःचा विकास हाच त्यांचा मंत्र होता.

मराठीत एक म्हण आहे, कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच राहतं. तुम्ही त्याला काहीही करा त्याचा कडवटपणा जाणार नाही. ही म्हण काँग्रेसला तंतोतंत लागू होते. कारण काँग्रेसवाले कधीच सुधारणार नाहीत. ते कधीच बदलणार नाहीत. त्यांनी आतापर्यंत जी कूकर्मं केली आहेत त्यामुळे त्यांनी देशातला जनाधार गमावला आहे. त्यामुळे काँग्रेसने आता फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबलं आहे. तुम्ही त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा पाहा, त्यात मुस्लीम लीगची भाषा दिसतेय. ते तुम्हाला मान्य आहे का? देश हे सगळं स्वीकारेल का?

हे ही वाचा >> “…तेव्हा बाळासाहेब ठाकरे स्वत: काँग्रेसविरोधात उभे राहिले होते”, पंतप्रधान मोदींकडून काश्मीरचा उल्लेख करत हल्लाबोल!

पंतप्रधान म्हणाले, इंडी आघाडीचे खासदार भारताचा आणखी एक तुकडा पाडण्याच्या गोष्टी करत आहेत. दक्षिण भारताला आपल्या देशापासून तोडून वेगळा देश बनवण्याच्या गोष्टी करत आहेत. स्टलिन यांचा द्रमुक पक्ष सनातन धर्मावर टीका करतो. सनातन धर्माची डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराशी तुलना केली जाते, दुसऱ्या बाजूला काँग्रेसवाले बनावट शिवसेनेबरोबर मोर्चे काढतायत. भारत हे सगळं स्वीकारणार नाही.