PM Narendra Modi On Godhra Train Burning : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांना मुलाखत दिली आहे. कामत यांचे व्हिडीओ पॉडकास्ट ‘People By WTF’ मध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधान मोदींनी या मुलाखतीदरम्यान अनेक गंभीर व हलक्या फुलक्या मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी मोदी यांनी २००२ मधील गोध्रा ट्रेन जळीतकांड व २००५ मध्ये अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारल्याच्या घटनांवर भाष्य केलं. गोध्रा ट्रेन जळीतकांड व त्यामध्ये झालेल्या जीवितहानीचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “तो खूप वेदनादायी काळ होता. ते हृदयद्रावक दृश्य पाहिल्यानंतर मला खूप त्रास झाला. मात्र, मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं. मी त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले”.

नरेंद्र मोदी म्हणाले, “२४ फेब्रुवारी २००२ रोजी मी पहिल्यांदा आमदार झालो व २७ फेब्रुवारी रोजी विधानसभेत दाखल झालो. गोध्रा ट्रेन जळीतकांड झालं तेव्हा मी केवळ तीन दिवसांचा आमदार होतो. आधी आम्हाला ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर हळहळू आम्हाला घातपाताच्या बातम्या मिळू लागल्या. मी तेव्हा सभागृहात होतो. मी खूप चिंतेत होतो. मला तिथल्या (गोध्रा) लोकांची खूप काळजी वाटत होती. नंतर मी सभागृहातून बाहेर पडलो आणि म्हणालो, मला गोध्राला जायचं आहे. मात्र, त्यावेळी एकच हेलिकॉप्टर होतं. ते ओएनजीसीचं हेलिकॉप्टर होतं. मला सांगण्यात आलं की ते सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आहे. कोणत्याही व्हीआयपीला त्या हेलिकॉप्टरमधून जाण्याची परवागनी देता येणार नाही.

हे ही वाचा >> पंजाबमधील आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू, लुधियाना डीएमसी रुग्णालयात प्राणज्योत मालवली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी त्यांना म्हटलं, मी काही व्हीआयपी नाही. मी सामान्य नागरिक आहे. मला जाऊ द्या. मी स्वतःच्या जबाबदारीवर जाईन. माझं तिथल्या लोकांशी भांडण झालं. शेवटी मी त्यांना म्हटलं की मी हवं तर तुम्हाला लिहून देतो. जे काही होईल ती माझी जबाबदारी असेल. मी सिंगल इंजिन हेलिकॉप्टरने गोध्राला जाईन. त्यानंतर मी त्याच ओएनजीसीच्या सिंगल इंजिन हेलिकॉप्टरने गोध्रामध्ये पोहोचलो. तिथली दृश्ये पाहून मला खूप त्रास झाला. आजही वाईट वाटतं. तिथे होरपळलेल्या मृतदेहांचा खच पडला होता. मला ते पाहून त्रास झाला. मात्र मला माहिती होतं की मी अशा पदावर आहे जिथे मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल. मला स्वतःला सांभाळावं लागेल. मी त्यासाठी जे काही करू शकत होतो ते केलं आणि स्वतःला सावरलं.