भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीरचा मु्द्दा नेहमीच चर्चेत असतो. आता काश्मीरच्या मुद्द्यावरून सौदी अरेबिया या देशाने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान अल सौद यांनी काश्मीर हा मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय असल्याचे म्हटले आहे. तसेच दोन्ही देशाला चर्चेतून हा मुद्दा सोडावा लागेल, असेही म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज़ शरीफ़ यांच्या रियाध दौऱ्यादरम्यान सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान अल सौद यांची भेट झाली. यानंतर या भेटीचे संयुक्त निवेदन जाहीर करण्यात आले. यामध्ये सौदी अरेबियाने म्हटले की, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्य राखत या वादाचे निराकरण करायला हवे. जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी चर्चेला महत्व द्यायला हवे, असे म्हटले आहे.

हेही वाचा : दक्षिण गाझामधून इस्रायलचं सैन्य माघारी; नेमकं कारण काय?

पाकिस्तानकडून आतापर्यंत अनेकवेळा संयुक्त राष्ट्र संघात या मुद्यांवर आवाज उठविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, यावर भारताने काश्मीरचा प्रश्न हा द्विपक्षीय असल्याची भूमिका घेत यामध्ये दुसरे कोणीही मध्यस्थी करण्याची अवश्यकता नसल्याची भारताची भूमिका असल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान अल सौद यांची भेट घेतली होती. यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.आता सौदी अरेबियाने काश्मीरच्या समस्येवर भारताच्या भूमिकेला पाठिंबा देत पाकिस्तानला धक्का दिला आहे.