Shashi Tharoor Son Ishaan Tharoor Viral Video: पहलगाम हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताचं ऑपरेशन सिंदूर यासंदर्भात जगभरात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने विविध देशांच्या दौऱ्यावर सर्वपक्षीय प्रतिनिधींची शिष्टमंडळं पाठवली. ही सर्व शिष्टमंडळं भारतात परतली असून वेगवेगळ्या देशात त्यांना आलेल्या अनुभवांसंदर्भात आता त्यांच्या भूमिका समोर येत आहेत. तसेच, या भेटींचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर हे वॉशिंग्टन डीसी येथे गेलेल्या शिष्टमंडळाचा भाग होते. या भेटीदरम्यान त्यांच्या एका पत्रकार परिषदेतला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतानं Operation Sindoor च्या माध्यमातून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतरही पाकिस्तानी लष्करानं केलेल्या आगळिकीला भारतीय लष्करानं सडेतोड उत्तर दिलं. या संपूर्ण घडामोडींसंदर्भात जगासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी या शिष्टमंडळांचे दौरे पार पडले. या दौऱ्यांदरम्यान या शिष्टमंडळांनी त्या त्या देशातील प्रमुख नेत्यांची, इतर संघटना व प्रतिनिधींची भेट घेतली.

काय झालं पत्रकार परिषदेत?

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून या पत्रकार परिषदेत चक्क थरूर यांचा मुलगा इशान थरूर हाच त्यांना प्रश्न विचारण्यासाठी उभा राहिला असता थरूर यांनी त्यावर मिश्किल टिप्पणी केली. “हे असं घडू देण्याची परवानगी दिली जाऊ नये. हा माझा मुलगा आहे”, असं थरूर यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

इशानचा प्रश्न आणि शशी थरूर यांचं उत्तर…

इशान थरूर वॉशिंग्टन पोस्टसाठी पत्रकारिता करत असून या माध्यम संस्थेचा प्रतिनिधी म्हणून तो तिथे उपस्थित होता. “पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याबाबत तुमच्या सरकारकडे कुणी पुरावे मागितले आहेत का?” असं इशाननं विचारताच त्यावरही शशी थरूर यांनी मिश्किल टिप्पणी केली. “हा एक खूप चांगला प्रश्न आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी त्याला मुद्दाम प्रश्न विचारायला सांगितलेलं नाही”, असं शशी थरूर यांनी म्हणताच पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

यानंतर शशी थरूर यांनी इशानच्या प्रश्नावर मुद्देसूद उत्तर दिलं. “पाकिस्तानच्या सहभागासंदर्भात कुणालाच शंका नव्हती. आम्हाला कुणीही पुरावे माहितले नाहीत. पण माध्यमांनी हे प्रश्न उपस्थित केले. मी तुम्हाला हे स्पष्ट करू इच्छितो की सबळ पुराव्यांशिवाय भारतानं ही कारवाई केलीच नसती”, असं थरूर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शशी थरूर यांनी मांडले तीन मुद्दे

दरम्यान, यावेळी शशी थरूर यांनी उत्तरादाखल तीन मुद्दे मांडले. “पाकिस्तानच्या सहभागासंदर्भात तीन महत्त्वाची कारणं मी सांगेन. एक तर गेल्या ३७ वर्षांत वारंवार झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा आणि पाकिस्ताननं त्यात सहभागाचं सत्य फेटाळल्याचा इतिहास आपल्यासमोर आहे. अमेरिका अजूनही हे विसरलेली नाही की जोपर्यंत ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या कँटोनमेंट परिसरात आर्मी कॅम्पजवळच्याच पाकिस्तानी सेफ हाऊसमध्ये सापडला नाही, तोपर्यंत तो कुठे आहे हे आपल्याला माहितीच नसल्याचा दावा पाकिस्तान सरकारकडून केला जात होता. मुंबई हल्ल्यातही त्यांनी सहभाग असल्याचा इन्कारच केला होता. पण एक दहशतवादी (कसाब) जिवंत पकडला गेला. त्याचं नाव, ओळख, पाकिस्तानमधील पत्ता हे सगळं उघड झालं. पाकिस्तानात कुठे प्रशिक्षण घेतलं होतं तेही त्यानं सांगितलं. भारतीय व अमेरिकन गुप्तहेर खात्यानं या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांना प्रत्येक मिनिटाला सूचना देणाऱ्या पाकिस्तानी मास्टर माईंडचा आवाज रेकॉर्ड केला आहे. त्यामुळे पाकिस्तान काय आहे हे आपल्याला माहिती आहे”, असं शशी थरूर यांनी सांगितलं.