‘सीबीएसई’ पेपरफुटीचे प्रकरण

सीबीएसईच्या दहावी गणित व बारावी अर्थशास्त्राच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणी दिल्लीत संतापाची लाट उसळली असून दोषी व्यक्तींवर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान पोलिसांनी शुक्रवारी आणखी दहा जणांचे जाबजबाब  घेतले असून गुरुवारी ३५ जणांची चौकशी करण्यात आली. सीबीएसईच्या परीक्षा नियंत्रकांकडेही तपास करण्यात आला. पेपरफुटीच्या प्रकरणात निषेध करण्यासाठी काही विद्यार्थी संसद मार्गावर जमले होते. निषेध आंदोलनात काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया या संघटनेचाही समावेश होता. त्यांनी शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रोखण्यात आले. एनएसयूआयचे नेते नीरज मिश्रा यांनी सांगितले की, अनेक शिक्षण संस्था या परीक्षा माफियांच्या कचाटय़ात आहेत. सीबीएसईचे अध्यक्ष व मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर  हे यास जबाबदार आहेत. जावडेकर व सीबीएसईच्या अध्यक्षा अनिता कारवाल यांनी या प्रकरणात राजीनामा द्यावा. दहावी गणित व  बारावी अर्थशास्त्र फेरपरीक्षेच्या तारखा लगेच जाहीर करा, मुलांना फेरपरीक्षा सक्तीची करू नका अशा दोन मागण्या एनएसयूआयने केल्या आहेत.  एनएसयूआयचे अध्यक्ष फिरोझ खान व दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष कुणाल सेहरावत यांना दिल्ली पोलिसांनी  जावडेकर यांच्या भेटीसाठी नेले. जावडेकर यांनी त्यांच्या मागण्यांवर निर्णय  घेण्याचे आश्वासन दिले. पेपरफुटीप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने आणखी १० जणांची चौकशी केली असून सीबीएसई परीक्षा नियंत्रकांशीही संवाद साधला, असे पोलिसांनी सांगितले.

सहा विद्यार्थ्यांना अटक

सीबीएसई पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी झारखंड येथून सहा विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी चार जणांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

‘शिक्षणमंत्र्याची बैठक बोलवा’

सीबीएसई पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची एक बैठक आयोजित करावी आणि भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही याची खातरजमा करावी, अशी मागणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे.

‘मोदींनी विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे धडे द्यावेत’

सीबीएसई पेपरफुटीवरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी यांनी आता ‘एग्झॅम वॉरिअर्स’ या पुस्तकाचा पुढील भाग लिहावा आणि पेपरफुटीमुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे धडे शिकवावे, असे गांधी यांनी म्हटले आहे.

जावडेकरांचे विद्यार्थ्यांनाच आवाहन

पेपरफुटीच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी विद्यार्थ्यांनाच केले आहे. पेपरफुटीची समस्या हेही एक आव्हान असून आता विद्यार्थ्यांनाच ही समस्या सोडविण्याचे आपले आवाहन आहे, असे ते म्हणाले.